केरळ : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागातील तुवालाथीराम बीचजवळ रविवारी संध्याकाळी एक हाऊसबोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातातील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. मलप्पुरमच्या एसपींनी ही माहिती दिली. बोटीत ४० ते ४५ जण होते असे सांगण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केरळमधील मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूने मी दुःखी आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना मी व्यक्त करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत दिली जाईल.
केरळचे क्रीडा मंत्री व्ही अब्दुर हिमन, जे पर्यटन मंत्री पी ए मोहम्मद रियास यांच्यासोबत बचाव कार्याचे समन्वय साधत आहेत, यांनी सांगितले होते की या दुर्घटनेत २२ लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील बहुतेक मुले शाळेच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला आलेली होती. मलप्पुरमच्या ओट्टुमपुरममधील थुवलाथीरम येथे रविवारी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. एक महिला आणि दहा वर्षांच्या मुलीची ओळख पटली असून, अन्य मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेनंतर पोहून सुरक्षित स्थळी पोहोचलेल्या एका तरुणाने सांगितले की, हाऊसबोटीमध्ये किमान ४० ते ५० पर्यटक होते. स्वत:ला शफीक असे सांगणाऱ्या व्यक्तीने ही बोट डबल डेकर असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन दरवाजे होते पण बोट उलटल्यानंतर आतील दरवाजे बंद झाले.
अधिक बळी हाऊसबोटखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बोट उलटली होती. याची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस त्याचा तपास करतील. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी एक निवेदन जारी करून जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि आपत्कालीन बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले. निवेदनात म्हटले आहे की, अग्निशमन आणि पोलिस युनिट्स, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील तनूर आणि तिरूर भागातील स्थानिक लोक बचाव कार्यात सहभागी आहेत. मंत्री अब्दुरहिमान आणि रियास हे बचावकार्याचे समन्वय साधत असल्याचेही त्यात म्हटले आहे. पाण्यातून बाहेर काढलेल्यांना जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाऊसबोट पलटण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.




