सावंतवाडी : मला पैसे नकोत, मला माझ्या पायावर पुन्हा उभं राहण्यासाठी हात द्या अशी मागणी सदर मुलीने सामाजिक बांधिलकीकडे केली आहे.
भटवाडी येथील वाडेकर कुटुंबाची व्यथा ऐकून सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते भावुक झाले. अठरा वर्षांपूर्वी पती गेला. सहा वर्षा पूर्वी मुलगा एक्सीडेंट मध्ये गेला. तर वयाच्या सहाव्या वर्षी मुलीला ताप येऊन अचानक अपंगत्व येऊन हळूहळू चालणं बंद. असा दुःखांचा डोंगर घेऊन जगत असणाऱ्या मायलेकीला सामाजिक बांधिलकीने आधार दिला.
मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी अपंगत्व आल्याचे डॉक्टरने सांगून टाकलं “हि जास्त काळ जगू शकत नाही तिला चांगलं चांगलं खायला द्या” हेच वाक्य मुलीच्या डोक्यामध्ये अजूनही घर करून राहिलं. आणि आज ती 21 वर्षाची असून “मी एक ना एक दिवस नक्कीच चालेन” या आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर ती टी. वाय. बी. कॉम च्या शेवटच्या वर्षापर्यंत येऊन पोचली. आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्या कारणाने तिच्यावर योग्य ट्रीटमेंट होऊ शकली नाही. तरीही भटवाडी परिसरातील लोकांनी त्यांना आर्थिक हातभार दिला. कित्येक वर्ष ती भटवाडी येथील भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत.
आज सामाजिक बांधिलकीचे सदस्य शेखर सुभेदार यांनी या घटनेची माहिती देताच त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीची टीम पोचून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. “आर्थिक मदत नको परंतु मला माझ्या स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी मला हात द्या. मला माझी परिस्थिती सावरायची आहे त्यासाठी मला जॉब करायचा आहे. मला त्यासाठी मला आपली साथ हवी आहे द्याल ना…?” असं सांगून ती भावुक झाली.
सामाजिक बांधिलकीचे सेवानिवृत्त प्रा. सतीश बागवे यांनी त्या मुलीला सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून योग्य ट्रीटमेंट मिळावी यासाठी प्रयत्न करूच परंतु शिक्षणाला मदत व कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी ऍडमिशन घेऊन देईल असं सांगून तिचा आत्मविश्वास वाढवला. कित्येक दिवसांनी आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिच्या आईचं दुःख अनावर झालं.
अशावेळी समीरा खलील मॅडमने त्या दोघींनाही धीर दिला व आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू असे सांगितले. तसेच निळेली साहस संस्थेचे भीमराव हळदीकर व हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप कोल्हापूरचे विश्वस्त रेखा देसाई, सुजाता गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत हर्षदा वाडेकर हिला व्हीलचेअर प्रधान केली. तर सामाजिक बांधिलकीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, समीरा खलील, शेखर सुभेदार, साधले सर, प्रा. सतीश बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, शाम हळदणकर, शेखर सुभेदार व शरद पेडणेकर यांनी तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी स्वीकारली.





