चेन्नई : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे देशभरात अवकाळी अवकाळी पावसाची पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाचा परिणाम भारतीय रेल्वेवरही झाला असून 144 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक ट्रेनचा मार्ग बदलण्यात आले आहे.
वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी –
चक्रीवादळामुळे चेन्नई, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशसह आसपासच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांत या भागात वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. चेन्नई, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
चक्रीवादळामुळे 144 गाड्या रद्द –
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकारच्या सतत संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितलं. चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मिचॉन्ग वादळाच्या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट –
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 90 ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या राज्यांतील परिस्थितीची माहिती घेत तयारीचे आदेश दिले आहेत.
तामिळनाडू, चेन्नई आणि आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता एनडीआरएफ टीमला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. येथे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकांनी पेरंगलाथूर जवळील पीरकंकरनई आणि तांबरम भागातील सुमारे 15 लोकांना शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यामुळे वाचवले.





