मुंबई : जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला पहिले वहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. गेल्या स्पर्धेत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. नीरज हा जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके जिंकणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी नीरजचे अभिनंद केले आहे. भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी देखील नीरजच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी बोलताना गावसकर यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्राबद्दलही एक मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, येत्या 10 ते 15 वर्षात भारत देखील स्पोर्टिंग देश म्हणून ओळखला जाईल.
सुनील गावसकर यांनी नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पीटीआयशी बोलताना आपले मत व्यक्त केले. गावसकर म्हणाले की, ‘खूप आनंद झाला. भारताचे इतर खेळ देखील चांगली कामगिरी करत आहेत. नीरजला आपण यापूर्वीही पाहिलं आहे. त्याने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.’
‘नीरजने यावेळी सुवर्ण पदक जिंकणे गरजेचे होते. आज त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. यामुळे इतर खेळाडूंना देखील प्रेरणा मिळते. तुम्ही पाहिलं असेल की यावेळेच्या स्पर्धेमध्ये नीरजसोबत अजून दोन भारतीय भालाफेकपटू फायनलमध्ये पोहचले होते.’
सुनील गावसकरांनी भारतीय क्रीडा क्षेत्राबद्दल एक मोठे वक्तव्य देखील यावेळी केले. ते म्हणाले की, ‘एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो त्यावेळी तो खेळ खेळणाऱ्या इतर खेळाडूंना प्रेरणा मिळते. सध्या खेळाडूंना ज्या प्रकारे संधी मिळत आहे ते पाहते मला वाटते की, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडे जसं स्पोर्टिंग नेशन म्हणून पाहिलं जातं तसं कदाचित 10 ते 15 वर्षात भारताबद्दलही तसं बोललं जाऊ शकतं.’



