नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय स्मार्ट शहरे पुरस्कार स्पर्धा २०२२ – विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये पुन्हा एकदा इंदूरने बाजी मारत सर्वोत्कृष्ट ‘नॅशनल स्मार्ट सिटी अवॉर्ड’ जिंकला आहे. इंदूरनंतर दुसरा क्रमांक सुरतला तर तिसरा क्रमांक आग्रा शहराला मिळाला आहे. ८० पात्रताधारक स्मार्ट शहरांमधून ८४५ नामांकने आली होती. त्यातील एकूण ६६ अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहराचा समावेश आहे.
भारतीय स्मार्ट शहरे पुरस्कार स्पर्धेच्या विजेत्या शहरांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहराला प्रशासन श्रेणीत स्मार्ट सारथी अॅपसाठी सन्मानीत करण्यात येणार आहे. तर पश्चिम विभागातील विभागीय स्मार्ट शहराचा पुरस्कार सोलापूर शहराला जाहीर झाला आहे. २७ सप्टेंबर रोजी इंदूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.
२५ जून २०१५ रोजी स्मार्ट शहर (सिटी) मिशनची सुरुवात
नागरिकांना, स्मार्ट उपाययोजनांच्या वापराद्वारे मूलभूत पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत वातावरण सुखी जीवनमान प्रदान करणे या उद्देशाने २५ जून २०१५ रोजी स्मार्ट शहर (सिटी) मिशनची सुरुवात झाली होती. देशातील शहरी भागात विकासात्मक आदर्श बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत एकूण प्रस्तावित प्रकल्पांपैकी १ लाख १० हजार ६३५ कोटी रुपये किमतीचे ६ हजार ४१ (७६%) प्रकल्प पूर्ण झाले आहेत. ६० हजार ९५ कोटी रुपये किमतीचे उर्वरित १ हजार ८९४ प्रकल्प ३० जून २०२४ पर्यंत पूर्ण होतील.





