बस प्रवासात ५०% आरक्षणचा ६ आसनी व्यावसायिकांना फटका | रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

78

सिंधुदुर्ग : शासनाने एसटी प्रवासासाठी महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्याने महामंडळाला सुगीचे दिवस आले असले तरी सहा आसनी प्रवासी वाहतूकदारांना याचा फटका बसला असून त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या बाबत सकारात्मक विचार करून सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांनी मदत करण्याची मागणी आचरा येथील श्री देव रामेश्वर मॅजिक प्रवासी वाहतूक चालक मालक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण हिर्लेकर यांनी केली आहे.

शासनाच्या एसटी प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याच्या निर्णयाने एसटी महामंडळाला सुगीचे दिवस आले असले तरी प्रवासी वाहतूकीवर कुटूंबाची गुजराण करणारे सहा आसनी, मॅजिक रिक्षा व्यावसायिक मात्र संकटात सापडले आहेत. पूर्वी आचरा तिठा ते कणकवली दिवसाला ९ ते १० बसणारया फेऱ्या आता केवळ एक ते दोन वर आल्या आहेत.

यामुळे इतर रिक्षा व्यावसायिकांना केवळ आचरातिठ्यावर प्रवाशांच्या प्रतिक्षेत गाडी लावायची आणि फेरी झाली नाही याचे दु : ख करीत घरी जायचे असा दिनक्रम सध्या सुगीच्या दिवसात सुरू आहे. त्यामुळे कुटुंबाची गुजराण सोडा गाडी घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते ही सुटत नसल्याने उपासमारीची वेळ आली असल्याचे रिक्षा व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. याबाबतश्री देव रामेश्वर मॅजिक प्रवासी वाहतूक चालक मालक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण हिर्लेकर यांनी सांगितले की नोकरया नाहीत म्हणून व्यवसाय करण्यासाठी रिक्षा घेतल्या त्याही चालत नाहीत सध्या मॅजिक रिक्षा व्यावसायिकांवर बिकट परिस्थितीत आली आहे.

आरटीओ च्या नियमानुसार असलेल्या टॅक्स शिवाय पर्यावरण कर, व्यवसाय कर, जीपीएस,पॅनिक बटण, आदीची सक्ती केली जाते. जिकडे व्यवसायच होत नाही तिथे एवढ्या गोष्टी करणार कश्या. यासाठी भौगोलिक परीस्थितीचा विचार करुन शासनाने नियम करावेत. जर दिवसभरात एकही ट्रिप झाली नाही तर मॅजिक व्यावसायिकांनी करायचे काय. यासाठी शासनाने लक्ष देण्याची मागणी हिर्लेकर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत मॅजिक रिक्षा व्यावसायिक चंद्रशेखर सुतार, बबलू नाईक, संतोष गोरवले, प्रसाद चव्हाण आदी उपस्थित होते.