मुख्यालयातील पत्रकारांची समाजाभिमुखता वाखणाण्याजोगी : राजन परब

सिंधुदुर्गनगरी : पत्रकाराने समाजहित डोळ्यासमोर ठेऊन आपली पत्रकारिता केली पाहिजे. जी समाजाला आणि देशाला पुढे नेणारी असेल.अशीच पत्रकारिता मुख्यालयातील पत्रकारांनी आत्तापर्यंत केली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील असे सांगतानाच कोरोना कालावधीत मुख्यालयातील पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, समाजासाठी काम केले. त्यामुळे त्यांची समाजाभिमुखता वाखाणण्यासारखी आहे, असे प्रतिपादन कसाल सरपंच राजन परब यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक संघ, कसाल यांच्यावतीने कोरोना या महामारीच्या कालावधीत मुख्यालयातील पत्रकारांनी केलेलं काम याची दखल घेत मुख्यालयातील सर्व पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी कसाल सरपंच राजन परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघ कसालचे अध्यक्ष पांडुरंग सावंत, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालवलकर, इशेद फर्नांडिस, घोगळे गुरुजी, कसाल पोलिस दुर्क्षेत्राच्या हेडकॉन्स्टेबल शेळके आदि उपस्थित होते.

सिंधुदुर्गनगरी मुख्यालयातील पत्रकार नेहमीच लोकांचे प्रश्न वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांच्या पत्रकारितेमुळे आतापर्यंत बऱ्याच जणांना न्याय मिळालेला आहे. कोरोना कालावधीत मुख्यालयातील पत्रकारांनी एकही दिवस सुट्टी न घेता आपले कर्तव्य पार पाडले. यात काही पत्रकार कोरोना बाधितही झाले. तरीही त्यांनी आपले काम सोडले नाही.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघाच्या विद्यमान सचिव देवयानी वरसकर, मुख्यालय पत्रकार संघाचे उपाध्यक्ष लवू म्हाडेश्वर यांनी आपली मनोगते मांडली.