मुसळधार पाऊस व समुद्राला असलेल्या उधाणाचा फटका बसून बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील भागाला धोका निर्माण झाला होता. तातडीने उपाययोजना म्हणून तातडीने आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने बंधारा घालण्याचे काम हाती घेतले होते. अधिवेशनानंतर तात्काळ आमदार निलेश राणे यांनी तळाशील भागाला भेट देत किनारपट्टीची पहाणी करत ग्रामस्थांशी संवाद साधत आपली किनारपट्टी भक्कम बंधाऱ्याने सुरक्षित केली जाणार असून 800 मीटर व 500 मीटरचा दुसरा टप्पा असणाऱ्या बंधाऱ्यांसाठी 13 कोटी रुपये मंजूर असून येणाऱ्या मे महिन्यापर्यंत बंधारा पूर्ण केला जाणार असल्याची ग्वाही आमदार राणे यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार राणेंचे तसेच तात्काळ दखल घेणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले की मागील वेळेला तळाशील बंधारा व्हावा म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन केले होते मी आमदार नसतानाही ग्रामस्थांची भेट घेतली. बंधाऱ्यासाठी 10 कोटीचा निधी उपलब्ध करून देतो असे सांगितले होते. त्याची कार्यवाही पण चालू केली त्यावेळेस राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्राचा खासदार केंद्राचा 10 कोटीचा निधी येत होता परंतु तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने अनेक कारणे देत तो निधी इथे येऊ दिला नाही. केवळ राणेंना श्रेय मिळेल म्हणून हा निधी नाकरण्याचे काम त्यांनी केले. तळाशील चा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता केवळ राणे कुटुंबाला श्रेय मिळेल म्हणून तळाशील ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालण्याचे काम त्यांनी केले आहे. आता परिस्थिती बदलली आहे आमचं सरकार आहे कोणत्याही अडचणी आल्या त्या दुर सारून विकास साधला जाणार असल्याची ग्वाही आमदार राणे यांनी ग्रामस्थांना दिली. तळाशीलचा भुभाग वाचला असेल तर तो राणेंमुळेच असे उदगार ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच जयहरी कोचरेकर यांनी काढले.
गावावर प्रसंग ओढवला असताना तळाशीलात दत्ता सामंत हे ठाण मांडून होते यंत्रणा राबवत तळाशील सुरक्षित करत होते असे सांगत दत्ता सामंत यांचेही ग्रामस्थांच्या वतीने कोचरेकर यांनी आभार मानले.