कणकवली : अलीकडेच मुख्य महामार्गाचे सोडा.! मात्र कणकवली शहरातील काही मुख्य रस्त्यांची दैनावस्था झालेली आहे. तर काही ठिकाणी पॅच मारून मलमपट्टी केलेली प्रत्यक्ष निदर्शनास येते. असे असताना अनेक गावांचा संपर्क असणारा पटकीदेवी मंदिर ते नागवे पर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. मात्र याकडे लक्ष देणार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
शहरातील पटकीदेवी मंदिर ते श्री देव स्वयंभू मंदिर पर्यत जाणारा नागवे मुख्य रस्ता डांबरीकरणाचे काम मंजुर होऊन २ महिने होऊन देखील अजुन प्रत्यक्षात काम सुरु झाल्याचे दिसुन येत नाही. याबाबत कणकवली युवा सेनेकडून सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना निवेदन देत लक्ष वेधले.
यावेळी श्री. सर्वगोड यांनी हे काम येत्या काही दिवसात मार्गी लागेल असे आश्वासन दिले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, विधानसभा प्रमुख सचिन सावंत, उपशहरप्रमुख वैभव मालंडकर, युवा सेना उपशहरप्रमुख सोहम वाळके, शाखाप्रमुख संतोष राणे, सत्यवान राणे, यश घाडीगावकर, अक्षय घाडीगावकर आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, या रस्त्यावरून नागवे – करंजे – हरकुळ – फोंडा पंचक्रोशीतील नागरीक प्रवास करत असतात. त्यामुळे सदर रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या सर्व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता कणकवली शहरातील मुख्य रस्त्यापैकी एक प्रमुख रस्ता असल्यामुळे आपण जातीनिशी लक्ष घालून येत्या ८ दिवसात काम चालु करावे अन्यथा कणकवली ग्रामस्थांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.





