तालुक्‍यात ठिकठिकाणी काँग्रसतर्फे हात से हात जोडो अभियान…!

वेंगुर्ले : हात से हात जोडो अभियान कार्यक्रमा अंतर्गत राहूल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेचा उद्देश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सिंधुदुर्गात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली.

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे देशवासीयांना उद्देशून लिहलेले पत्र आणि भाजपची गेल्या नऊ वर्षांतील कुकर्माचा पंचनामा करणारी पत्रके वाटण्यात आली. गेल्या नऊ वर्षांत देशात कसे द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहेत. धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात संवैधानिक संस्थाचा वापर ज्या पद्धतीने करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. जो सरकारला प्रश्न विचारेल त्याला देशद्रोही ठरविले जात आहे.

गेल्या नऊ वर्षांत केंद्रतील भाजप सरकार देश चालवण्यात अपयशी ठरले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे युवक बेरोजगार आहेत उद्योग धंदे बंद पडत आहेत लोकांच्या असलेल्या नोकऱ्या जात आहेत नोटबंदी आणि चुकिच्या जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे व यावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे जाणूनबुजून उकरून काढले जात आहेत या संदर्भात हात से हात जोडो अभियांतर्गत जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस प्रविण वरुणकर, तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.