टिळक कुटुंबात तिकिट न दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला काहीही अर्थ नाही : नाना पटोले

मुंबई : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्रिय झाले असून त्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही फोन केले असल्याची माहीती पुढे आली आहे. पण भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला काही अर्थ राहत नसल्य़ाचे म्हटले आहे.

गेले काही दिवस चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकिय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर करून कसबा पेठ येथून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाबाहेर हेमंत रासने यांना तिकीट दिले, तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी देण्यात आली.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले य़ांनी आज पत्रकार परिषद घेऊन या विषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले “हे खर आहे कि ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी मलाही फोन केला होता. पण महाराष्ट्रातील राजकिय परंपरेनुसार जर कुटुंबातील व्यक्तींना जर तिकीट मिळाले तरच आपण निवडणुका बिनविरोध करतो. भाजपने कसबा पेठ येथून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाबाहेर तिकिट दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला काही अर्थ उरत नाही.” असे बोलून कॉंग्रस प्रदेशाध्यक्षांनी या निवडणुका होणारच असा इशाराच दिला आहे.