पुणे : राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचा विरोध नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात ही भेट होती. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमधील प्रवेशाबाबत ही बैठक नव्हती, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या दोन नेत्यांची भेट महाविकास आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिली.





