लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे मुंबईत निधन; शांताबाईंनी ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

17

 

मुंबई (प्रतिनिधी)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे मुंबईत निधन; शांताबाईंनी ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लाडकी लेक म्हणून प्रसिद्ध असलेल्या व संपूर्ण आयुष्यभर कम्यूनिष्ठ पक्षासाठी सेवाव्रती जीवन जगलेल्या काँ. शांताबाई साठे- दोडके (वय-९०) यांचे मुंबईतील कांदवली येथील सेव्हन स्टार रूग्णालयात रविवारी दुपारी निधन झाले. त्यांच्यावर बोरीवलीतील दौलतनगर स्मशानभूमीत सायंकाळी ७.३० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

लेखक विश्वास पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शांताबाई साठे यांच्या आठवणींना उजाळा दिला. घाटकोपरच्या चिरागनगरच्या झोपडपट्टीत 1958 च्या दरम्यान अण्णा ‘फकीरा’ कादंबरी लिहित होते. सतत तीन महिने अहोरात्र लेखन करून शेवटी अण्णा भाऊ त्या बेहोषीत अतिश्रमाने खाली कोसळले होते. तेव्हा याच शांताबाईंनी त्यांना सावरले होते, असे विश्वास पाटील म्हणाले. अण्णा भाऊ साठेंच्या द्वितीय पत्नी जयवंताबाई दोडके यांच्या शांता आणि शकुंतला या दोन लेकी. चिरागनगरच्या झोपडपट्टीत अण्णाभाऊंनी एकाहून एक अशा अप्रतिम कादंबऱ्या आणि कथा लिहिल्या. तेव्हा अण्णाभाऊ आणि जयवंताबाईंच्या सहचर्यामध्ये अण्णा भाऊंची साहित्यगंगा जशी काही दुधडी भरून वाहत होती. त्याच दिवसात अण्णांनी “माकडीचा माळ”, “बरबाद्या कंजारी”, “चित्रा”, “चंदन” “वारणेचा वाघ” , “आवडी” अशा अनेक कथा व कादंबऱ्या लिहिल्या होत्या.

अण्णा भाऊ साठेंच्या प्रेरणेने शांताबाई स्वतः कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीमध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यांनी प्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी, कॉम्रेड रेड्डी व शाहीर अमर शेख, कॉम्रेड गव्हाणकर व इतरांच्या सोबत तुरुंगवासही भोगला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 15 ऑगस्टला छोट्या शांता आणि शकुंतला यांना घेऊन अण्णाभाऊ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाची आरास बघून आले होते. 21 नोव्हेंबर 1955 ला जेव्हा मोरारजीच्या पोलिसांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी झुंज देणाऱ्या 15 हुतात्म्यांचा बळी घेतला. त्या रात्री अण्णाभाऊ आपल्या झोपडपट्टीच्या दारात रात्रभर “माझी मैना गावावर राहिली” ही प्रसिद्ध रणलावणी लिहीत होते. त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या साक्षीदार शांता आणि शकुंतला ह्या दोघी बहिणी होत्या. अण्णांसोबत त्या रात्रभर जागल्या होत्या. अविवाहित शांताबाई आपल्या भाच्यांकडे म्हणजेच शकुंतला सपताल यांच्या मुलांकडे राहत. संजय, राजेश आणि प्रशांत ह्या सपताल बंधूनी आपल्या मातेसमान मावशीची, शांताबाईंची खूप काळजी घेतली होती. कालच वार्धक्याने शांताबाईंचे वयाच्या 90 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. गेले काही दिवस त्या सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. पण लिव्हर आणि किडनीच्या आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.