तेरेखोल नदीपात्र व ओहोळांमधील गाळ साफसफाई करा ; बांदा ग्रामस्थ व सदस्य यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी

28

बांदा (मंगल कामत) दि १३ जून २०२४

 

तेरेखोल नदीपात्र व ओहोळांमधील गाळ साफसफाई करा ; बांदा ग्रामस्थ व सदस्य यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी

 

येथील ग्रामस्थ प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य यांनी आज सावंतवाडी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले.
निवेदनात असे म्हणण्यात आले की, बांदा हे बुडीतक्षेत्रात येत असल्याने पावसाळ्यात कायम पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते.ज्यामुळे बांद्यातील व्यापारी वर्ग,शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. महाराष्ट्र शासनाच्या नद्यांमधील गाळ उपसा करण्याबाबतच्या धोरणानुसार, तेरेखोल नदीतील गाळ,वाळूमुळे निर्माण झालेली बेटे,राडा-रोडा बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर व क्षेत्रात कंत्राटे देण्यात आली व काम देखील सुरू झाले. परंतु बांदा तेरेखोल नदी क्षेत्रातील गाळ उपसा करण्यात आला नाही. तो वेळीच काढण्यात आला असता तर, बऱ्याच अंशी होणारे संभाव्य नुकसान टाळता आले असते. आता गाळ काढणे शक्य नसल्यास अजून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झालेला नसल्याने, किमान तातडीने बांद्यातील नदीपात्रात मिळणाऱ्या सर्व ओहोळांमध्ये तयार झालेली बेटे,माती,राडा-रोडा, दगड धोंडे काढून ओहोळ स्वच्छ करण्यात यावेत. तसेच ओहोळ जेथे नदीला मिळतात, तेथील तोंडावरील गाळ काढल्यास पाणी वाहून जाण्यास सोपे होईल व नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल. तरी यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती करण्यात आली. यावर बोलताना तहसीलदार श्री.पाटील यांनी सांगितले की, सदर बाबतचा अहवाल आपण तातडीने जिल्हाधिकारी यांना पाठवतो व याबाबत तत्परतेने पाठपुरावा करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामस्थ गुरु कल्याणकर व निलेश उर्फ पापु कदम यांनी पुरामुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत शासनाने विचार करून याबाबतची गंभीरता ओळखत तातडीने अंमलबजावणी करावी अशी विनंती केली. तसेच 2021 मधील पुरामुळे व्यापारी व नागरिकांची नुकसान भरपाई त्वरित वितरित करण्यात यावी अशीही विनंती केली. यावर श्री पाटील यांनी सांगितले की,सर्वप्रथम घर नुकसानीचे वाटप त्वरित करण्यात येईल.
यावेळी चर्चा करताना बांदा ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी पानवळ येथील स्मशानभूमीच्या जागे संदर्भातील परवानगीबाबत माननीय तहसीलदार यांना विनंती केली. त्यावर तहसीलदार पाटील यांनी आपण माहिती घेऊन ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बांदा ग्रामपंचायत उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत,रत्नाकर आगलावे, ग्रामस्थ श्री गुरु कल्याणकर, निलेश उर्फ पापु कदम, गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते.