विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय मनसैनिक स्वस्थ बसणार नाहीत -अविनाश जाधव

7

विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय मनसैनिक स्वस्थ बसणार नाहीत -अविनाश जाधव

जानवली येथे मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

कणकवली दि २०(तुळशीदास कुडतरकर)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी मनसैनिक काम करणार आहेत. या मतदारसंघातून विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय मनसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. मनसैनिक अपला घरचा उमेदवार म्हणून राणेंचा प्रचार करतील, अशी ग्वाही मनसेचे नेते तथा ठाणे, पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. दरम्यान, या बैठकीला आमदार नीतेश राणे यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.

जानवली येथील सावली हॉटेलमध्ये मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बैठकीत श्री. जाधव बोलत होते.

यावेळी मनसेचे नेते शिरीष सावंत, मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी, मनसेच्या कामगार संघटनेचे नेते गजानन राणे, संपर्कप्रमुख संतोष शिगांडे, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, सावंतवाडी मतदारसंघाचे प्रमुख अनिल केसरकर, मनसेच्या एसटी कामगार संघटनेचे नेते बनी नाडकर्णी, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे प्रमुख धीरज परब, माजी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री , कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये आदी उपस्थित होते.

अविनाश जाधव म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजय होण्यासाठी मनसैनिकांनी कामाला लागावे. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना उबाठा गट शिल्लक राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे वाढविण्याची संधी धीरज परब व अनिल केसरकर यांना आहे, या संधीचे त्यांनी सोने करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

शिरीष सावंत म्हणाले, महाराष्ट्रातून मनसेच्या इंजिनातून कमळ दिल्लीला पाठवणार आहोत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, याकरिता भाजपला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

नीतेश राणे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी विक्रमी मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या खाद्याला खांदा लावून काम करावे. या मतदारसंघातून नारायण राणे यांचा विजय निश्चित असून मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव होणार आहे, असा दावा राणे यांनी केला. येत्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मनसेलासोबत घेतले जाईल. त्यावेळी मनसेच्या उमेदवारांना निवडून आणणे ही माझी जबाबदारी असल्यााची ग्वाही राणेंनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, याकरिता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल राज ठाकरे यांचा मी आभारी आहे. राज ठाकरे व नारायण राणे यांचे नाते हे राजकारणापलीकडे आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून नारायण राणे हे उमेदवार आहेत. त्यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकांनी त्यांचा प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे सीएम व्हावेत, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा हास्यापद आहे. उद्धव ठाकरे व संजय राऊत हे बंटीबबली आहेत, अशी टीका राणेंनी केली.

राज ठाकरे यांनी यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला, याचा शिवसेना उबाठाला पोटशूळ का? असा सवालही राणेंनी केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसादार राज ठाकरे आहेत, म्हणून नियतीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था बिकट केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

धीरज परब, अनिल केसरकर यांनी आपले मनगोत करताना राणेंना विजयी करण्यासाठी मनसैनिकांनी जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी जिल्ह्यात मनसेचे नेटवर्क स्टॉग करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गजानन राणे यांनी मनसेचे धोरण व राज ठाकरे यांची भूमिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समजून सांगितली. सूत्रसंचालन मयुर ठाकूर यांनी केले. या बैठकीला मनसेचे स्थानिक पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.