कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार ४५० कोटी ; कणकवली येथील कणकसिंधु शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण…
कोकणातील पर्यटनाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल -रविंद्र चव्हाण
कणकसिंधु शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण…
कणकवली (तुळशीदास कुडतरकर)दि ८ मार्च २०२४
कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. दळणवळणाची साधने आहेत ती सुलभ झाली पाहिजेत आणि रस्तेही सुस्थितीतीत झाले पाहिजेत. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये ५ हजार ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कणकवली येथील कनकसिंधु या अत्याधुनिक सर्व सोयींनीयुक्त बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ. नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी अधीक्षक अभियंता छाया नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, महेंद्र कीनी,उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू, उपअभियंता विनायक जोशी,
श्री. बासुतकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाअध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महेश सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते.
पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, माझ्या विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या हेड मध्ये ही विकास कामे केली गेलेली आहेत. आपण पाहिलं असेल कणकवलीच जे रेस्टहाऊस आहे. त्याच कामही चांगल्या पध्दतीने केलेलं आहे. त्याचबरोबर मालवण, वेंगुर्ले किंवा प्रत्येक ठिकाणची रेस्टहाऊस जे आहेत. ती सुस्थितीत केली गेली आहेत. त्यामध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती त्याची प्रशंसा करतो. दरम्यान शासकीय रिक्त पदांबाबतही गतिमान पध्दतीने भरती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पध्दतीने विकास चालु आहे.

अतिशय तरुण आणि मेरिट वरती विद्यार्थी या बांधकाम विभागामध्ये काम करु लागले आहेत. त्यामुळे चांगल्या पध्दतीने बांधकाम विभागामध्ये काम होणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन एक वेगळ्या पध्दतीने केंद्र आणि राज्य डबल इंजिनचे जे सरकार आहे. ते गतिमान पध्दतीने काम करत आहे, असे ना. रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण नूतन शासकीय विश्रामगृहाचे पाहणी केली. यावेळी व्हीव्हीआयपी सूट आणि अंतर्गत सोयीसुविधा याबद्दल कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आणि आमदार नितेश राणे यांनी कौतुक केले.




