भुजबळांवर तुटून पडले, मराठा आरक्षणासाठी एकहाती लढले.!; भास्कर जाधवांचे विधानसभेत घणाघाती भाषण.

53

नागपूर : आरक्षणप्रश्नी ज्या लोकांनी भाषण केलं त्यामध्ये फक्त छगन भुजबळांनी एकांगी भाषण केलं, बाकी कुणी केलं नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला. तुम्ही राज्याचे वरिष्ठ मंत्री आहात, आयुष्यभर सत्तेत आहात, तुम्हाला राज्यात काय घडवायचं आहे? असा सवालही त्यांनी केला. मराठा समाजाची आजची अवस्था ही सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी झाली आहे, त्यामुळे मराठ्यांना आरक्षणाची गरज असल्याचं ते म्हणाले.

मराठ्यांना उत्पन्नाचे साधन काय?

मराठ्यांवर संरक्षणाची जबाबादारी होती. इंग्रज आले आणि त्यांनी डोकं चालवलं. मराठे आपल्याला कापायला कमी करणार नाहीत म्हणून लढाई केली आणि त्यामधून तरुण मुलांना कापण्यात आलं. त्यानंतर सिलिंग अॅक्ट आला, कुळ कायदा लागू झाला. कोकणात जमीन कोणाला जास्त नाही. मग मराठ्यांना उत्पादनाचं साधन काय आहे? आम्ही रयतेचे राजे, जहागीरदार म्हणुन मिरवत राहिलो, मात्र पुढचं भविष्य अंधकारमय करुन ठेवलं. मराठा समाजाचा परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे.

भुजबळांचे भाषण एकांगी –  

आज भुजबळ बोलत आहेत, मात्र त्यांची आणि फडणवीस यांची काय जुगलबंदी झाली त्याचा प्रत्येक शब्द मी आणला आहे. संशयाची सुई कोण फिरवत आहे. एकांगी भाषण हे फक्त भुजबळ यांचं झालं. नाव घेऊन सांगतो. आयुष्यभर तुम्ही सरकारमध्ये आहात, वरिष्ठ मंत्री आहात. काय घडवायचं काय आहे या महाराष्ट्रात? राज्यात नऊ जातीय दंगली झाल्या. शाहू महाराज यांच्या कोल्हापूरमध्ये दंगली झाल्या.

जालन्यात लाठीचार्जचा आदेश कुणी दिला हे सर्वांना समजू द्या.!

मनोज जरांगे यांच्या आदोलनामध्ये महिला या भजन गात होत्या, पण त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देण्यात आला. तो आदेश कुणी दिला याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. आतापर्यंत मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेत झाले. हे मोर्चे लाखोंचे होते आणि कुठेही काहीही हिंसा न घडता ते पार पडले. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली. पण आताच का म्हणता की मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली? त्या आंदोलनाबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते.