‘सिंधुदुर्ग’ शिवरायांच्या सामर्थ्याचं प्रतिक, त्यांच्या काळातलं समुद्री सामर्थ्य परत कमवायचं आहे.! ; PM नरेंद्र मोदींचे गौरोवोद्गार.

106

मालवण : ज्याचं समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा ओळखलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.!, त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला, असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप असल्याचंही ते म्हणाले. शिवरायांनी कमावलेली ती नौदलाची शक्ती आपण नंतर गमावलो, आता ती पुन्हा मिळवायची आहे असंही ते म्हणाले. नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गवर साजरा होतोय हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

समुद्री सामर्थ्याचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं –

भारताचा इतिहास शौर्याचा आणि सामर्थ्याचा असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं असतं ते शिवाजी महाराजांनी जाणलं. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं. समुद्रावर ज्याचं वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे शिवाजी महाराजांनी ओळखलं. शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे यांच्यासारखी लोक उभी केली. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला हे शिवाजी महाराजांच्या शक्तीचे प्रतिक आहे. भारतीय नौदलातील गटांचे भारतीयीकरण, त्यांची नावं भारतीय करण्यात येणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.