नवी दिल्ली : आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा चढवला आहे. पराभवाचा राग संसदेतकाढू नका, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पंतप्रधान मोदी यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. देशातील जनतेनं नकारात्मकतेचा पराभव केला आहे, अशा शब्दात मोदींनी विरोधकांच्या पराभवावर निशाणा साधला आहे. चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपने तीन राज्यांत दमदार विजय मिळवला आहे, तर काँग्रेसला एका ठिकाणी सरकार स्थापन करता येणार आहे.
”सुधरा, नाहीतर जनताच तुम्हाला साफ करेल”
पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटलं की, शिवीगाळ, निराशा आणि नकारात्मकता घमंडिया आघाडीसाठी हेडलाईन्स बनू शकतात, पण जनतेच्या मनात स्थान देऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी विरोधाकांना इशारा देत म्हटलं आहे की, ”सुधरा, नाहीतर जनताच तुम्हांला साफ करेल. हा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीसाठी मोठा धडा आहे.काही घराणेशाहीचे लोक एकत्र एका मंचावर आल्याने फक्त चांगला फोटो येऊ शकतो, पण देशाचा विश्वास जिंकू शकत नाही. देशातील जनतेचं मन जिंकण्यासाठी राष्ट्रसेवा करणं गरजेचं आहे.”
पराभवाचा राग संसदेत दाखवू नका : पंतप्रधान मोदी
विरोधकांच्या पराभवावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुकीत ज्यांच्या पराभव झाला आहे, त्यांनी संसदेत त्यांचा राग दाखवू नका. पंतप्रधानांनी पुढे म्हटलं की, लोकशाहीमध्ये पक्ष आणि विपक्ष समान आहे. राजकारणात जनतेचं हित विसरू नका. हा निवडणुकीचा निकाल सकारात्मक पद्धतीने जनतेसमोर आणा, असं आवाहन पंतप्रधानांनी राजकीय विश्लेषकाना केलं आहे.
तीन राज्यांमध्ये भाजपचं सरकार –
विधानसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये दमदार विजय मिळाला आहे, तर काँग्रेसला तेलंगणामध्ये विजय मिळाला आहे. तीन राज्यांतील विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, ”काही लोक याला सरकार समर्थक सुशासन किंवा पारदर्शकता म्हणतात, हे देशात दिसून येत आहे. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, लोकांच्या आकांक्षा बळकट करण्यासाठी लोकशाहीचं मंदिर महत्त्वाचं व्यासपीठ आहे. मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, त्यांनी तयार राहून संसदेत मांडलेल्या विधेयकांवर सखोल चर्चा करावी.”





