लोकसभा निवडणुकांमध्ये ‘ही’ ६ राज्य NDA चं टेन्शन वाढवणार? ; सर्वेक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक!

160

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एनडीए आपली सत्ता टिकवण्यासाठी तर, विरोधकांची आघाडी असलेली इंडिया भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहे. दोन्ही गट आपापली रणनीती आखण्यात गुंतले आहेत. दरम्यान, टाइम्स नाऊच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी फारच धक्कादायक आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, विजय आपलाच अशा अविर्भावात असलेल्या एनडीएला 6 राज्यांमध्ये जोरदार धक्का बसू शकतो.

सर्वेक्षणानुसार, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, इंडिया आणि NDA आघाडीला फक्त दोन टक्क्यांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं विजय मिळण्याची अपेक्षा आहे. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांमध्ये 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत विरोधी आघाडीला तसा फारसा फायदा होताना दिसत नसला. तरीदेखील एनडीएला मात्र काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणाची सॅम्पल साईज एक लाख 10 हजारांहून अधिक आहे. सुमारे 60 टक्के लोकांचे फोनवरून सर्वेक्षण करण्यात आले असून 40 टक्के लोकांना घरोघरी जाऊन प्रश्न विचारण्यात आले आहेत.

 एनडीएला 29 ते 43 जागांचे नुकसान?

बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 198 जागा आहेत, ज्यासाठी दोन्ही आघाडींमध्ये लढत होणार आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत येथील एकूण जागांपैकी एनडीएला 163 जागा जिंकता आल्या. यावेळच्या सर्वेक्षणानुसार या राज्यांमध्ये एनडीएला 120 ते 134 जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला येथे सुमारे 29 ते 43 जागांचं नुकसान होऊ शकतं. विरोधकांच्या इंडियाला काही प्रमाणात फायदा होत असला तरी एनडीएच्या तुलनेत त्यांच्या जागा खूपच कमी असण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये कोणाचं पारडं जड? 

सर्वेक्षणानुसार, राजस्थान विधानसभा निवडणुकीत एनडीएला 20 ते 22 जागा, इंडिया आघाडीला 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर वोट शेअरचा विचार केला तर राजस्थानमध्ये एनडीएला 55.20 टक्के, इंडियाला 35.90 टक्के आणि इतरांना 8.90 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेशबाबत निष्कर्ष काय? 

मध्य प्रदेशात लोकसभेच्या 29 जागा आहेत, त्याचप्रमाणे या राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वेक्षणात एनडीएला 24 ते 26 जागा, इंडिया अलायन्सला 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास, एनडीएकडे 52.90 टक्के, भारताला 39.90 टक्के आणि इतरांना 7.20 टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात एनडीएला किती जागा?

महाराष्ट्रात एनडीएला 28 ते 32 जागा, विरोधी पक्ष इंडिया अलायन्सला 15 ते 19 जागा आणि इतरांना 1 ते 2 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मतांची टक्केवारी पाहता एनडीएला 46.30 टक्के, भारत आघाडीला 41.20 टक्के आणि इतरांना 12.50 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

बिहारमधील 40 जागांवर कोणाचं वर्चस्व?

बिहारमधील एनडीएचा जुना साथीदार जेडीयू यावेळी इंडिया आघाडीसोबत आहे. सर्वेक्षणात एनडीएला 22 ते 24 जागा, इंडियाला 16 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, एनडीएला 46.10 टक्के, इंडियाला 44.20 टक्के आणि इतरांना 9.70 टक्के मतं मिळण्याची अपेक्षा आहे.

सर्वेक्षणातील बंगाल आणि झारखंडची आकडेवारी

पश्चिम बंगालमध्ये एनडीएला 16 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, टीएमसीसह इंडिया आघाडीला 23 ते 27 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणात एनडीएला 42.90 टक्के, इंडियाला 54.90 टक्के आणि इतरांना 2.20 टक्के मतं मिळण्याची अपेक्षा आहे. झारखंडमध्ये एनडीएला 10 ते 12 जागा मिळतील, तर इंडियाला 2 ते 4 जागा मिळतील. तसेच, एनडीएला 52.40 टक्के, इंडियाला 43.30 टक्के आणि इतरांना 4.30 टक्के मतं मिळू शकतात.