सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लघु व उच्चदाब वीज ग्राहकांना एप्रिल- मेच्या बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याची स्वतंत्र बिले दिली होती. मात्र, ४८ लाख ५१ हजार ५३६ ग्राहकांनी दोन हजार ३५२ कोटी ५९ लाख रुपये भरलेच नाहीत. त्यांना आता ‘महावितरण’ने ३० दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख ग्राहक आहेत. मुदतीत रक्कम न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार आहे.
वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या ऑनलाइन भरण्याची सोय www.mahadiscom.in वेबसाइट व ‘महावितरण’च्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. ग्राहकांनी रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
वीजग्राहकांनी याआधी भरलेली सुरक्षा ठेव व नियमानुसार आवश्यक असलेली ठेव, यातील फरकाच्या रकमेची स्वतंत्र बिले एप्रिल व मे महिन्यात देण्यात आली आहेत. तरीदेखील लघुदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ४८ लाख ४७ हजार १२० ग्राहकांकडे एक हजार ८५३ कोटी सात लाखांची आणि उच्चदाबाच्या चार हजार ४१६ वीजग्राहकांकडे ४९९ कोटी ५२ लाखांची थकबाकी आहे.
जिल्हानिहाय सुरक्षा ठेवीची थकबाकी
पुणे जिल्ह्यात २५ लाख ८१ हजार १४ ग्राहकांकडे एक हजार ४८७ कोटी ९२ लाख, सातारा जिल्ह्यातील चार लाख ८४ हजार ७५७ ग्राहकांकडे १३४ कोटी ६४ लाख, सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख ५७ हजार ४७५ ग्राहकांकडे १८१ कोटी १६ लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील सात लाख ३३ हजार ८०३ ग्राहकांकडे ४०७ कोटी १५ लाख आणि सांगली जिल्ह्यातील चार लाख ९४ हजार ४८७ ग्राहकांकडे १४१ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
जिल्हानिहाय सुरक्षा ठेवीची थकबाकी
पुणे जिल्ह्यात २५ लाख ८१ हजार १४ ग्राहकांकडे एक हजार ४८७ कोटी ९२ लाख, सातारा जिल्ह्यातील चार लाख ८४ हजार ७५७ ग्राहकांकडे १३४ कोटी ६४ लाख, सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख ५७ हजार ४७५ ग्राहकांकडे १८१ कोटी १६ लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील सात लाख ३३ हजार ८०३ ग्राहकांकडे ४०७ कोटी १५ लाख आणि सांगली जिल्ह्यातील चार लाख ९४ हजार ४८७ ग्राहकांकडे १४१ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी आहे.





