डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणूकीत वीजेच्या झटक्यानं २ जणांचा जागीच मृत्यू, तर ४ गंभीर जखमी

150

पालघर :  जिल्ह्यातल्या विरार भागातील कारगिल नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकी दरम्यान वीजेचा झटका लागल्यानं २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विरारच्या कारगिल नगर मधल्या बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. त्या दरम्यान गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.


घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, भीम सैनीक, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमींनी नालासोपाऱ्याच्या तुळींज रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, नायब तहसीलदार सीके पवार यांनी घटना स्थळाला भेट दिली.

कागगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉलीवर ) ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील झंड्याचा लोखंडी रॉडचा स्पर्श हा जवळील ट्रांसफार्मर ला झाला . आणि त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील ६ जण होरपळले गेले. त्यातल्या रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे . तर ४ जण जखमी झाले. त्यातील उमेश कनोजिया (१८), राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३)या ३ गंभीर जखमी जणांना रात्री मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.तसचं अस्मित कांबळे (३२) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान मिरवणूक संपवून परतत असताना ट्रॉलीवरील झंड्याच्या लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याने वीजेचा झटका लागून ही दुर्घटना घडल्याची माहिती विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली आहे . या दुर्घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.