नवी दिल्ली : एरवी आपण मच्छर पळवण्यासाठी अथवा मारण्यासाठी मच्छर विरोधी कॉइल किंवा स्प्रे यांचा वापर करतो. दिल्लीत घडलेल्या घटनेने मात्र मच्छर कॉइलने मच्छर ऐवजी माणसांनाच यम सदनी पाठवले .दिल्लीच्या शास्त्री पार्कमध्ये एक मोठी घटना उघडकीस आली आहे. जी प्रत्येक व्यक्तीसाठी धोक्याची घंटा आहे. डासांना घरातून हाकलून लावण्यासाठी मच्छर कॉइल जाळली जाते. मात्र, याच कॉईलमुळे शास्त्री पार्कमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल सहा जण मृतावस्थेत आढळले आहेत.
डासांपासून सुटका व्हावी म्हणून आजकाल मच्छर कॉईल सर्रास वापरली जाते. ही कॉईल लावल्याने डास पळून जातात, असा मोठा समज आणि अनुभव अनेकांचा आहे. त्यातही विविध कंपन्यांच्या विविध प्रकारच्या मच्छर कॉईल बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, आता हीच कॉईल थेट जीवघेणी ठरल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली पोलिस उपायुक्त (पश्चिम) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री कुटुंब मच्छर कॉइल पेटवून झोपले होते. आणि आज सकाळी घरातील सर्वच्या सर्व म्हणजे ६ जण मृतावस्थेत आढळले. या कुटुंबाने मच्छर कॉईल घरात लावली होती. या कॉईलमधून कार्बन मोनोऑक्साइड बाहेर पडला. आणि याच वायूमुळे सहाही जणांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे. मच्छर कॉईलमुळे संपूर्ण कुटुंबच नष्ट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





