कणकवली : जुगाराच्या पैशाची आर्थिक देवाण – घेवाणीतुन झालेल्या भांडणातून कणकवलीत रिक्षाचे मोठे नुकसान केल्याप्रकरणी बुधवारी रात्री कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार केल्याच्या आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत तुझी वाट लावतो असे सांगत गुरुवारी मध्यरात्री १:३० वा. च्या सुमारास घरासमोर लावलेली रिक्षा जाळून टाकल्याची खळबळ जनक घटना कलमठ मठकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडली.
या संदर्भात सुरज जाधव (कणकवली – कलमठ मठकर कॉम्प्लेक्स) यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली, असून या फिर्यादीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण यांच्यासह आप्पा शिर्के यांच्या विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा जाळण्याच्या या प्रकाराने मात्र तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सुरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज जाधव यांचे जुगाराच्या पैशाच्या देवान – घेवाणीवरून वरून बुधवारी आप्पा शिर्के यांच्यासोबत भांडण झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रिमेश चव्हाण, सुनील काणेकर व चेतन पाटील यांनी शिवीगाळ करत धमकी दिली तसेच रिक्षाच्या पुढील मडगळवर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी सुरज जाधव यांनी कणकवली पोलिसात बुधवारी रात्री चार जनांविरोधात तक्रार दाखल केली. सुरज जाधव हे घरी जात असताना रिमेश चव्हाण यांनी तू रिक्षा घेऊन घरी जा तुझी वाटच लावतो अशी धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी हे घरी गेले असता रात्री झोपत असताना त्यांना घराच्या खिडकीतून बाहेर ज्वाळा दिसू लागल्या. त्यावेळी त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता रमेश चव्हाण व आप्पा शिर्के हे पळताना दिसून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पाणी मारून रिक्षाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीत रिक्षा जळून बेचिराख झाली होती. तर या रिक्षाच्या बाजूला संकेत फोंडेकर यांच्या असलेल्या दोन दुचाकी ना देखील आगीची झळ बसली.
आगीत रिक्षाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कणकवली पोलिसात संशयित आरोपींच्या विरोधात ४३५ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





