रुद्राक्ष महोत्सवात जखमी झालेल्या व मृत्यू पावलेल्यांना पंडित प्रदीप मिश्रा व आयोजक जबाबदार…!

108

दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची महाराष्ट्र अंनिसची मागणी…!

रुद्राक्षामध्ये श्रीमंत होण्यासाठी म्हणजेच कुबेर बनण्यासाठी सर्व लक्षणं असतात, तो बाळगल्याने किंवा त्याची पूजा केल्याने चमत्कार घडतो आणि मनुष्य श्रीमंत होतो. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर जर हे चमत्कारिक रुद्राक्ष प्रदान केले किंवा त्याची पूजा केली तर नक्कीच श्रीमंत होता येते, असा अवैज्ञानिक सल्ला, मार्गदर्शन पंडित प्रदीप मिश्रा नामक व्यक्तीने त्यांच्या विविध धार्मिक प्रवचनांमध्ये दिल्याचे समजते. एवढेच नव्हे तर मध्यप्रदेशातील सिहोर येथे असलेल्या कुबेरेश्वर धाम स्थळावर अशा चमत्कारीक रूद्राक्षाचा महोत्सव त्यांनी आयोजित केला. तेथे अशा चमत्कारिक रूद्राक्षाचे मोफत वाटप करण्यात येणार होते. म्हणून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक तिथे पोहोचले. परिणामी वाहतूक, आरोग्य, खाणे- पिणे निवारा आदी सर्व व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्या. प्रचंड चेंगराचेंगरी होऊन, हजारो लोक जखमी झाले. काही मृत्युमुखी पडले.

धर्माच्या व धार्मिकतेच्या नावाखाली आपण असे अवैधनिक सल्ले लोकांना दिल्यानंतर काय घडू शकते, याचा काहीही विचार पंडित प्रदीप मिश्रा व प्रायोजकांनी केला नसल्यानेच ही दुर्घटना घडली. त्यात अनेक जण जखमी झाले व अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. अजून काही जण बेपत्ता आहेत. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. धार्मिक महोत्सवाच्या नावाखाली घडवून आणलेल्या या दुर्घटनेला प्रदीप मिश्रा व तेथील आयोजक जबाबदार आहेत. त्यांच्यावर कडक कायदेशीर करण्यासाठी केंद्र सरकारने मध्य प्रदेश सरकारला तातडीने आदेश दिले पाहिजेत, अशी महाराष्ट्र अंनिसची मागणी आहे.

चमत्कार घडतो, असे देवाधर्माच्या ,अध्यात्माच्या नावाखाली लोकांना सांगणे म्हणजे राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याशी प्रतारणा करणे होय. म्हणून कोणी, कितीही सांगितले तरी प्रामाणिकपणे व मेहनतीने कमावलेल्या संपत्तीतूनच खरा आनंद व सुख मिळते. रुद्राक्ष परिधान करून किंवा तत्सम गोष्टी करून कोणाचेही आयुष्य बदलू शकत नाही, संकटं दूर होऊ शकत नाहीत, आपोआप सुख मिळत नाही.

म्हणून लोकांनी अशा तथाकथित अध्यात्मिक, धार्मिक भोंदूबुवांच्या भूलथापांना कधीच बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, गजेंद्र सुरकार, नंदकिशोर तळाशीलकर व डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले आहे.