सर्वांनी सहभागी व्हावे : ए आर गोखे, संचालक, एमएसएमइ यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
कणकवली : केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे “एमएसएमई उद्योगांची वाढ आणि विकास यांना असलेला वाव” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 19 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे तसेच केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती एम एस एम इ चे संचालक ए आर गोखे यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत जितेंद्र कुमार शुक्ला, सचिव वायर बोर्ड, मनोज कुमार सिंग, क्षेत्रीय महाप्रबंधक, योगेश भामरे, राज्य संचालक, केवीआयसी हे देखील उपस्थित होते.

या चर्चासत्र व प्रदर्शन कार्यक्रमासाठी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. यामध्ये उद्यम असिस्ट पोर्टल अंतर्गत पाठबळ पुरवण्यात आलेल्या अनौपचारिक सूक्ष्म उद्योगांना प्रमाणपत्रांचे वितरण, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती केंद्राअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, सिंधुदुर्गातील जनसमृद्धी खादी ग्रामोद्योगात नव्याने सुरु करण्यात आलेल्या खादी संस्थेला चरखा तसेच हातमागांचे वितरण इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.
हे राष्ट्रीय चर्चासत्र एमएसएमई क्षेत्राशी संबंधित योजनांबाबत जागरूकता निर्माण करेल आणि युवकांना उद्योजकतेचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करुन आत्मनिर्भर भारत साकारण्याच्या निर्धाराला आणखी मजबूत करेल. सदर प्रदर्शन म्हणजे उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे सादरीकरण करण्याच्या तसेच व्यापारविषयक संधी शोधण्याच्या दृष्टीने मिळालेली अद्वितीय संधी असेल. असा विश्वास यावेळी संबंधितांनी व्यक्त केला.





