नागपूर : अजित पवारांना विरोधी पक्षनेता करावं या पत्रावर आपण सही केली होती, असं रोहित पवारांनी म्हटलंय. मात्र हे पत्र दुसऱ्याच कारणासाठी वापरलं गेलं, असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केलाय. हे पत्र दुसऱ्यासाठी कारणासाठी वापरलं गेलं असेल तर हा चोरीचाच प्रकार आहे अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले, अजितदादांना विरोधीपक्ष करा, या पत्रावर मी सही केली होती. मात्र हे पत्र दुसऱ्याच कारणासाठी वापरलं गेलं . दुसरं पत्र होतं की ज्यावर अनेकांनी सही केली होती , ते पत्र कशाचं आहे ते कुणालाच माहिती नव्हतं. माझी तर त्यावर सही पण नव्हती
माझ्यावर आरोप करणारे जे लोक आहेत त्यांची समाजातली पत बघा. आम्ही सही केली होती विरोधीपक्ष नेता करावे म्हणून, पण ते पत्र दुसऱ्यासाठी वापरलं, म्हणजे हा चोरीचाच प्रकार आहे पत्र कोणते हेच त्यांनी स्पष्ट करावं.
राज्य सरकार हे आरक्षण मार्गी लावणार का? : रोहित पवार
मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एक सांगतात, फडणवीस दुसरं सांगतात. केसरकर, भुजबळ, विखे वेगवेगळं सांगतात यांच्यातील गोंधळ मिटवावा लागेल, यांनी भूमिका स्पष्ट करावी. या अधिवेशनात सरकारने भूमिका स्पष्ट करावी राज्य सरकार हे आरक्षण मार्गी लावणार का? की केंद्राकडे जावं लागेल हे कळायला पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण ठेवू नका: रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, तुम्ही मंत्री आहात, संवैधानिक पदावर आहात तेव्हा तुम्ही कॅबिनेटमधे चर्चा करू शकता. मग समाजसुधारक, विरोधक असल्यासारखे का बोलता. लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण ठेवू नका. गुन्हे मागे घेणं हे गृहमंत्र्यांच्या हातात असतं. आमच्या काळात अनिल देशमुख साहेबांनी तसं केलं होतं. फडणवीस साहेब जर शब्द देऊन पाळत नसतील तर मग अर्थ काय आहे? बीडमध्ये सामान्य कुटुंबियांवर जो अन्याय झाला त्याच्यावर उपाय काय? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.





