मुंबई : एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज पासून म्हणजेच सहा नोव्हेंबर पासून एसटी बस बंदची हाक देण्याता आली आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन केलं जाणार असल्याची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळला दिली आहे. त्यामुळं आता दिवाळीला एसटीने घरी जाणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षी केलेल्या संपातील अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कष्टकरी जनसंघाने पुन्हा एकदा ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात कामबंद आंदोलनाची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष अॅड.जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिली आहे.
ज्यामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये सेवा सलगता नियमित करणे व खाते अंतर्गत होणा-या परीक्षेसाठी २४० दिवसांची अट ताबडतोब रदद करण्यात यावी अशीही मागणी केली आहे. तत्कालीन परिस्थितीत ज्या सनदी अधिका-यांनी समिती गठीत करुन विलनीकरणाचा अहवाल सादर केला होता तो अहवाल रदद करावा, तेलंगाना राज्य सरकारच्या धर्तीवर एसटीचे शासनात विलनीकरण करावे, शासनानातील कर्मचा-यांप्रमाणे ४२टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचा-यांना थकबाकीसह मिळावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, शिस्त व आवेदन पध्दत ताबडतोब रदद करावी, इलेक्ट्रीक बसच्या करारामध्ये खासगी चालक वापरण्याचे कंत्राट ताबडतोब रदद करावे, दिवाळी करिता एक पगार बोनस द्यावा, सेवानिवृत्त कर्मचान्यांना ३५०० ऐवजी कमीतकमी १८ हजार पेन्शन द्यावी यासह अनेक मागण्या कष्टकरी जनसंघाने केल्या आहेत.





