मुंबई : दसरा मेळाव्यावरुन पुन्हा शिंदे आणि ठाकरे गटात राजकारण पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार असून शिंदे गटाचा मेळावा क्रास मैदानावर होणार आहे. सुरुवातीला शिवतीर्थ’साठी शिंदे गट आग्रही होता. शिंदेंच्या आमदारांनी तशी भूमिका देखील स्पष्ट केली होती. मात्र शिंदे गटाच्या आधी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थसाठी अर्ज केला होता. दरम्यान आज शिंदे गटाने त्यांचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर होणार असल्याचे सांगितले. तसेच महापालिकेत दाखल केलेला अर्ज देखील शिंदे गटाने मागे घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला. ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती.”
“बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवला, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?”, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.





