कुडाळ : ‘अस्सल मालवणी कुकारो’ या शीर्षकाखाली आज सिंधुदुर्ग नगरीत भव्य रॅली काढत लेझीम, ढोलपथक स्वच्छतेचा नारा देत, ओरोस जिल्ह्याच्या राजधानीत ‘मेरी माटी मेरा देश’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. येथील राजधानीतील माती भव्य कलशातून केंद्रात दिल्ली येथे जाणार आहे. कुडाळ पंचायत समिती आणि ओरोस ग्रामपंचायतने राबविलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करण्यात आले.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ओरोस यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मालवणी बोली भाषा असणाऱ्या ‘कुकारो’ या शीर्षकाखाली ‘मेरी माटी मेरा देश’ स्वच्छ्ता अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन ओरोस सिंधुदुर्गनगरीत कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या भव्य कार्यक्रमाची सुरुवात ओरोस तिठा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पुष्पहार घालून केली. भव्य रॅलीचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, ओरोस सरपंच महादेव घाडीगावकर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, मृणाल कार्लेकर, उमेदचे गणेश राठोड, प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, ग्रामसेवक सरिता धामापूरकर, ग्रामविस्तार अधिकारी आर. डी. जंगले, संजय ओरोस्कर, सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब, पंचायत समिती कुडाळच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, ओरोस ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, ओरोस न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयसेविका आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

या भव्य रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडून ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. स्वच्छतेच्या विविध घोषणांनी ओरोस राजधानी परिसर दणाणून निघाला. सुमारे चार ते पाच किलोमीटर ही रॅली काढण्यात आली. सुहासिनीनी हातात सजविलेले मातीचे कलश घेऊन जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश संजय भारूका, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या निवासस्थानी नेऊन या ठिकाणची माती या कलशामध्ये जमा करण्यात आली. या रॅलीचे सर्व अधिकाऱ्यांनी जल्लोषी स्वागत केले. त्यानंतर ही रॅली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात नेण्यात आली. या ठिकाणी स्वच्छ्ता अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी स्वच्छतेची सर्वांना शपथ दिली.
न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम..! – प्रजित नायर
अशा प्रकारचे भव्य दिव्य कार्यक्रम कोणी घ्यावे? असा प्रश्न केल्यास त्याचे एकमेव उत्तर असेल कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण. होय, माझ्या तीन वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर राज्यासाठी आदर्शवत असे कार्यक्रम योग्य नियोजनाखाली कमालीचे यशस्वी केले आहेत. आज ओरोस नगरीत ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत भव्य दिव्य कार्यक्रम राबवून यशस्वी केला. ‘न भूतो न भविष्यती!’ असा दिमाखदार कार्यक्रम करुन दाखविला. या महिन्यात ते सेवानिवृत्त होत आहेत. यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्य ठेवण्याची निश्चितच उणीव भासणार आहे. या त्यांच्या सेवेच्या उर्वरित 29 दिवसांत ते अजूनही काहीतरी वेगळा कार्यक्रम घेतील, असेही यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले. बीडीओ श्री. चव्हाण यांनी या सर्व उपक्रमात माझ्या पंचायत समितीच्या सर्व विभागासह लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, महिला बचत गट, आशा , अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांचे योगदान आहे, असे सांगितले.








