खुश करण्यासाठी नको, तर टिकणारे आरक्षण द्या.! : छत्रपती संभाजीराजे.

39

जालना : मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, फक्त खुश करण्यासाठी नको तर टिकणारे आरक्षण द्या. २०२४ च्या निवडणुकीत सुसंस्कृत राजकारणासाठी आमचे स्वराज उमेदवार रिंगणात दिसतील, असे प्रतिपादन स्वराज पक्षप्रमुख छत्रपती महाराज संभाजीराजे यांनी केले.

मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या छत्रपती संभाजीराजेंचे तालुक्यात ठिकठिकाणी मार्गावर जल्लोषात स्वागत झाले. शहरात विंचूर चौफुलीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

या वेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाचे संपर्कप्रमुख करण गायकर, प्रदेश सरचिटणीस धनंजय जाधव, उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे, आशिष हिरे, राज्य सचिव शिवाजी मोरे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात आदी उपस्थित होते.

संभाजीराजेंच्या हस्ते शहरात विंचूर चौफुली, क्रीडा संकुल, बदापूर रोड, तसेच धूळगाव, पाटोदा, गोंदेगाव, वाहेगाव, भरवस फाटा, देशमाने, जळगाव, एरंडगाव, रायते, अंगणगाव, पारेगाव, येवला, बाभूळगाव, पिंपरी, ठाणगाव, कातरणी, विखरणी, विसापूर, आडगाव रेपाळ आदी २५ शाखा फलकांचे अनावरण व शाखांचे उद्‌घाटन झाले. अंगणगाव येथील पैठणी क्लस्टरलाही त्यांनी भेट देत साड्या खरेदी केल्या.

महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर झाले असून, लोक विचलित झाले आहेत. राजकारणात कुठेही सुसंस्कृतपणा दिसत नसल्यामुळे ही अस्थिरता पाहूनच स्वराज पक्षाची स्थापना केली आहे. लोकांची इच्छा आहे, तेथे आम्ही उमेदवार देणार आहोत.

त्याचा सर्वेही सुरू आहे. महाराष्ट्र पिंजून काढत असून, अनेक रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी मी राजकारणात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपोषणस्थळावरील हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने हा विषय पुढे नेण्यात अर्थ नाही, असे सांगत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या जिवाची मला चिंता आहे.

समाज त्यांच्या पाठीशी असून ,सरकारने आरक्षणावर मार्ग काढणे गरजेचे आहे. आरक्षणासंदर्भात काही सूचना मीही केल्या आहेत. यापूर्वी दोनदा आरक्षण न टिकल्याचा वाईट अनुभव आल्याने सरकारला विनंती आहे, की फक्त खुश करण्यासाठी नको, तर टिकणारे आरक्षण द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

तालुकाप्रमुख आदित्य नाईक, ऋषी काळे, गोरख संत, नीलेश घायाळ, सचिन पाटोळे, गणेश पराते, रामदास गायकवाड, विकी कवाडे, नीलेश राऊत, निंबा फरताळे, अक्षय गवते, प्रवीण निकम, पांडुरंग शेळके, संदीप बर्शीले, ज्ञानेश्वर महाले, गोरख कोटमे, श्याम गुंड, रवींद्र मेंगाने, प्रकाश मस्के, तुषार शिंदे, ऋषिकेश पाटोळे, अमोल शिंदे, रवींद्र जाधव, सचिन जाधव, रमेश ठाकरे, संतोष सासे, शिवराज शिंदे, सुमित जाधव, पार्थ शिंदे, सिद्धेश सदावर्ते, संकेत वारे, दर्शन पवार आदी उपस्थित होते.

भुजबळांच्या बालेकिल्यात…

भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आपला दौरा असल्याचे विचारताच आम्ही पुढे कोण आहे, हे पाहत नाही. फक्त स्वराज्याच्या विस्तारासाठी व स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आलो असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. येथील पैठणी केंद्रात जाऊन त्यांनी पत्नीसाठी आठ ते नऊ साड्या खरेदी केल्या. पैठणी ब्रँड जगात पोचण्याची गरज असून, शासनाने त्यात लक्ष घालावे, अशी आवाहनही त्यांनी केले.