तिलारी पाटबंधारे प्रकल्पा अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे निकृष्ट – माजी आमदार परशुराम उपरकर.!

25

सावंतवाडी : तिलारी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या सावंतवाडी व  दोडामार्ग तालुक्यातील बहुतांशी कालव्यांचीं कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. दोडामार्ग येथील मुख्य कालवा पहिल्याच पावसात फुटला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येत्या सहा महिन्यात या सर्व कालव्यांच्या दुरुस्तीची कामे झाली पाहिजेत, तसेच नवीन कामे चांगल्या दर्जाची व्हावीत यासाठी लक्ष द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तिलारीचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्याकडे केली.

सावंतवाडीच्या दौऱ्यावर असलेल्या मनसे सरचिटणीस माजी आमदार जी. जी. उपरकर यांनी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कालव्यांच्या निकृष्ट कामासंदर्भात नूतन कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांची भेट घेत चर्चा केली.यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, प्रकाश साटेलकर, मंदार नाईक, निलेश देसाई, सुरेंद्र कोठावळे, नंदू परब, विजय जांभळे, स्वप्निल जाधव, अभि पेंडणेकर, प्रमोद गावडे, रमेश शेळके, सागर येडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उपरकर म्हणाले सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात विशेष करून राबविण्यात येणाऱ्या तिलारी आंतराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी कालवे मोठे कालवे वं दुरुस्ती करीता शासन कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. सावंतवाडी तालुक्यात तसेच बांदा निगुडे वं दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर कालव्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे शासनाचा पैसा वाया गेला आहे. दोडामार्ग तालुक्यातील मोठा वं मुख्य कालवा पहिल्याच पावसात पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने फुटला अनेक माणसे वाहून गेली. यात त्या कालव्याचे कामचं निकृष्ट झाले होते अशी बाब समोर आली या दुर्घटनेने शासनाचे देखील मोठे नुकसान झाले, याला जबाबदार कोण? असा सवाल उपरकर यांनी केला.

कोट्यावधी रुपयांचा खर्च फक्त कालवे दुरुस्तीसाठी करण्यात आला मात्र त्यांचीही कामे दर्जेदार झाली नाहीत. यापूर्वीचे कार्यकारी अभियंता होते त्यांनी कधीच कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवंत्ता तपासली नाही. त्यामुळे अशी निकृष्ट कामे होत राहिली असा आरोप उपरकर यांनी केला. सावंतवाडी तालुक्यातील बांदा निगुडेपासून पुढील कालवे सध्या सुस्थित नाहीत त्यावर लक्ष देऊन चांगल्या प्रकारे कामे करून घेण्यात यावीत.

शिक्षणमंत्री केसरकर यांनी नवीन कालवे उभारण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी साडे तीनशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तो निधी अद्याप मिळाला नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. केसरकर यांचे आश्वासन हवेतच विरले कि काय?, अशी टीका त्यांनी केली. यापुढे कालवे उभारणीची सर्व कामे चांगली दर्जेदार गुणवंत्ता पूर्ण झाली याची दक्षता घ्यावी, अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली. त्यावर नूतन कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी आपण नुकताच या पदाचा कार्यभार स्वीकारला असून लवकरच सर्व कामांची माहिती घेतली जाईल. ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे आढळल्यास ती पुन्हा योग्य पद्धतीने करून घेण्यात येतील. आपण स्वतः कामाच्या ठिकाणी भेट देऊन नवीन कालवे पूर्ण करून घेणार आहे, असे आश्वासन जाधव यांनी दिले.