रायगड /रोहा : शशिकांत मोरे
“अहो या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय!”, “पोलीस प्रशासन हाय हाय..!”, ”अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध जाहीर निषेध!”, “एक मराठा… लाख मराठा ..!” अशा विविध घोषणांनी आज संपूर्ण रोहा शहर मराठा समाज बांधवांच्या घोषणानी दणाणून गेले.जालना येथे आंदोलन कर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ रोहा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी तीव्र रोष व्यक्त केला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला.व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून रक्तबंबाळ केले हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा,अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल असे आवाहन रोह्यात सकल मराठा समाज बांधवांनी केले.
शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना अचानक सरकारच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुले,वयस्क व्यक्ती महिला भगिनी यांचा समावेश आहे त्यामुळे अशा सरकारचं आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.अहो या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय!,पोलीस प्रशासन हाय हाय,अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध!! जाहीर निषेध!! “एक मराठा,लाख मराठा” अशा विविध घोषणांनी आज संपूर्ण रोहा शहर मराठा समाज बांधवांच्या घोषनांनी दणाणून सोडला.
रोह्यात सकल मराठा समाज बांधवांनी अध्यक्ष प्रदीप (आप्पा)देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केवळ निषेधावर न थांबता सरकार विरोधी घोषणा देत या प्रवृत्तीचा रोष व्यक्त केला.याप्रसंगी उपाध्यक्ष नितीन परब,समीर शेडगे,अमित उकडे,महेश सरदार,राजेश काफरे, प्रकाश देशमुख,सुभाष देशमुख,बबन देशमुख, अनंत देशमुख,प्रशांत देशमुख,अमोल देशमुख,संदीप सरफले,परशुराम चव्हाण,लीलाधर देशमुख,निलेश शिर्के,मधुकर पारटे,मयूर पायगुडे,अजित मोरे,सूर्यकांत मोरे,चंद्रकांत पारटे,अक्षय देशमुख,महिलांमध्ये प्राजक्ता चौहान,स्वरांजली शिर्के यांसह रोह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात दुश्मनांच्या भगिनींना सुद्धा हात लावू नका असे सांगितले असताना जालनामध्ये आंदोलन करीत असताना महिलांनाही न पाहता ज्याप्रमाणे आमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला आणि रक्तबंबाळ करून ठेवले.या सरकार मधे जर का हे घडत असेल तर महिला सुद्धा यापुढे तलवारी काढण्यास कमी पडणार नाहीत असे निषेध व्यक्त करताना सकल मराठा समाज महिला भगिनी स्वरांजली शिर्के या आक्रमक झाल्या.
आंदोलन कर्त्यामध्ये पुरुष,महिला,लहान मुल मुलींवर जो लाटी चार्ज केला तो निंदनीय आहे.या सरकारला या कृत्याची परतफेड करावी लागेल याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष नितीनजी परब यांनी दिला आहे.
शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज केला हे निषेधार्थ आहे.आजपर्यंत शांततेत केलेल्या आंदोलनाला जर असे गालबोट लागत असेल तर यापुढे मराठा गप्प बसणार नाही भविष्यात हातात तलवारी घ्यायची वेळ आली तरी चालेल असे मराठा समाजाचे युवा कार्यकर्ते अमित ऊकडे यांनी सांगितले.
मात्र या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र भरात पसरत असताना उद्या मराठा समाजाच्या वतीने रोहा बंदची हाक दिली आहे.
खा.सुनील तटकरेनी निषेधकर्त्यांची घेतली भेट.
रोह्यात भाटे वाचनालयातील कार्यक्रम उरकून जात असताना रोह्यात राम मारुती चौकात निषेध करण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांची खासदार सुनील तटकरे यांनी भेट घेतली.या भेटी दरम्यान समाज बांधवांच्या भावना समजून घेत यापूर्वी सुद्धा सबंध देशभरात मराठा समाजाने अगदी शांततेच्या मार्गाने,लाखोंच्या संख्येने,एकही घोषणा न देत जी काही आरक्षणासाठी मोर्चे काढले.मात्र कालची जालना मधील घटना ही दुर्दैवी असून याचा मी निषेध करीत असून याबाबत सखोल चौकशी करून याठिकाणी सक्षम पोलीस अधिकाऱ्याने जी ही भूमिका घेतली त्यावर कार्यवाही करावी असे सांगून मी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
मराठा समाज बांधवांची उद्या रोहाबंदची हाक
जालन्यातील घटनेचा निषेध करीत पोलिसांच्या लाटी हल्ल्यानंतर रोह्यातील मराठा समाज बांधवांकडून तीव्र पडसाद उमटले.संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत असताना याच अनुषंगाने उद्या रविवार दि .०३ सप्टे रोजी सकाळी १० ते १२ या दोन तासांच्या अवधीकरीता वरील अमानुष कृत्याच्या निषेधार्थ रोहा बाजार पेठेतील सर्व दुकानदारांना एका पत्राद्वारे बंद साठी सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे रोहा तालुकाध्यक्ष प्रदीप(आप्पा) देशमुख यांनी केले आहे.





