पुणे : काँग्रेसकडून वारंवार कसबा विधानसभा निवडणूक लढलेले आणि पराभूत झालेले रोहित टिळकांचा आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार असल्याच्या वृत्ताने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित टिळक यांचे नाव वरिष्ठ पातळीवरूनच सुचविले गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराची घोषणा झाल्याचा क्रम दाखविला जातो आहे. मात्र टिळक यांनी भाजपात जाऊन हातून निसटलेला कसबा विधानसभेचा गड खेचून आणायचा कि लोकसभा लढवून भाजपचा नवा चेहरा म्हणून पुढे यायचे यावर वरिष्ठ स्तरावर खल होत असावा असा सूत्रांचाही अंदाज आहे.
देशात भाजपाची म्हणजेच मोदी शहा यांची सत्ता आल्यावर अन्य पक्षातील काही नेत्यांमध्ये प्रचंड चलबिचल सुरु झाली, हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे नेते होता होता भाजपात पोहोचले, असे म्हणतात कि विश्वजित कदमांनी गेल्या लोकसभेतच काँग्रेसची उमेदवारी लढूनच भाजपला साथ दिली. आता काँग्रेसच्या सहयोगी पक्षांतही फुट पडली आहे.शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची २/२ शकले झाली आहेत. शहर पातळीवर देखील त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. पुण्यात एकनाथ शिंदे यांचा ग्रुप भरारी घेत असताना पुण्याच्या नीलम गोऱ्हे यांनी देखील ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या समूहात असल्याचे दाखवून दिले आहे. शिवसेनेचे जुने जाणते नेते गडप आहेत. तसेच राष्ट्रवादी मध्ये देखील शहर अध्यक्ष प्रशांत जगताप वगळले तर कोणी विरोधक फारसे सक्रीय नसल्याचे दिसत आहे. या उलट अजित पवारांच्या पाठीशी नूतन अध्यक्ष दीपक मानकर यांनी राष्ट्रवादीतील मोठी फळी उभी केली आहे. तशीच नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी सेना उभी करायचे यतन सुरूच ठेवले आहेत. अशा अवस्थेतच शहर काँग्रेस मध्ये कोणाचा पायपुस कोणाला नाही अशी स्थिती आहे. प्रभारी शहर अध्यक्ष आणि माजी शहर अध्यक्ष यांच्यात मोठी दरी निर्माण झालेली आहे. आणि आबा बागुलांच्या सारखे ज्येष्ठ नेते एकाच जागेवर अडकवून ठेवल्याने या राजकारणापासून अलिप्त राहिलेले दिसत आहेत. एकीकडे विविध राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळत असताना पुणे शहर काँग्रेस मध्ये मात्र एकमेकंचे पाय खेचण्याची आणि मीच कसा मोठा नेता हे कार्यकर्त्यांचा संच न सांभाळता एकेकटे पुढे होऊन दर्शविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. निष्ठावंत म्हणणरे स्थानिक नेते असणारे देखील नेहमीप्रमाणे प्रादेशिक आणि राष्ट्रीय नेत्यांच्या पुढे मागे फिरत जीजी करत आपल्याच पोळीवर तूप ओढण्यात मश्गुल राहत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत जयंतराव टिळकांच्या पासून रोहित टिळकांपर्यंत काँग्रेस बरोबर राहिलेला युवा वर्ग देखील खचला आहे. त्याचीच परिणीती म्हणून रोहित टिळक भाजपकडे ओढले जात असावेत असे हि सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपमध्ये संधी मिळू शकते, वाव मिळू शकतो अशा आशा त्यांच्या पल्लवित होत असाव्यात असा दावा केला जातोय. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर नाही मात्र वरिष्ठ पातळीवरून रोहित टिळकांच्या नावाचा विचार झालेला दिसतो आहे. एकूणच राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही मात्र लोकसभा टिळकांना अवघड जाईल म्हणून विधानसभाच त्यांच्यावर सोपवून स्थानिक राजकारण हि सांभाळण्यात येईल, असेही बोलले जाते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय रोहित टिळक यांनी जाहीर केल्यावर शहर काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि कारवाईची मागणीही केली होती. मात्र आजवर याबात कुठेही वरिष्ठ पातळीवर हालचाल दिसून आलेली नाही. मात्र या पुरस्कार समारंभानंतर टिळक यांना काँग्रेस पक्षात कसे स्थान मिळेल याबाबत देखील शंका आहेच या सर्व परिस्थितीची देखील या राजकारणाला जोड दिली जाते आहे.





