सावंतवाडी : सावंतवाडीच्या विकासा करीता ज्यादा रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठीसावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे
तळ कोकणातील अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक असणाऱ्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाची अवस्था केवळ शोभेची वास्तू असे झाले आहे. रेल्वे टर्मिनसचे बऱ्याच वर्षापासून रखडले काम आणि त्यामुळे आवश्यक असणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा नाही. यामुळे सावंतवाडीतील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. वेंगुर्ला व सावंतवाडी या दोन्ही तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.या पर्यटकांना रेल्वे प्रवासाची सुविधा नसल्याने पर्यटक येण्याचे प्रमाण देखील गेल्या काही वर्षात कमी होत आहे.
२४ जून २०१६ रोजी सावंतवाडी टर्मिनसचे उद्घाटन झाले. टर्मिनल फेज वन च्या कामाची सुरुवात व काम संपूर्ण होण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हे काम लवकर पूर्णत्वास जाऊ शकले. फेज टू मध्ये सावंतवाडी टर्मिनसचे काम गेली ५-६ वर्षे बंदच आहे. मध्ये कोराना काळामुळे काम बंद राहणे आम्ही समजू शकतो पण आजतागायत हे काम बंदच राहिले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास आणि जास्तीत जास्त गाड्यांना थांबा मिळाल्यास सावंतवाडीकरांचे मोठे स्वप्न पूर्ण होईल.
सध्या सावंतवाडी स्टेशनवर रोजच्या ९ व आठवड्याला धावणा-या ४-५ अशाच रेल्वे गाड्या थांबतात. यामुळे सावंतवाडी तालुक्यातील प्रवासी वर्गाची खूप मोठी गैरसोय होते. मुंबईला जायचे म्हटले तर सावंतवाडी स्टेशनवर ५-६ गाड्यांचेच पर्याय प्रवाशांना मिळतात. त्यातील अर्ध सिट ह्या रिझर्व कोट्यांकडे असल्यामुळे जनरल कोट्यांमध्ये तिकीट मिळणे कठीण होऊन बसते जवळच्या तालुक्यांतील स्टेशनवर किमान २५-३० गाड्या दिवसाला थांबवल्या जातात. यामुळे ना इलाजने तेथून रेल्वेचा पर्याय स्वीकारावा लागतो. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व सावंतवाडीचा वेगाणे होणारा विकास बघता ज्यादा रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्यास नक्कीच उपयोगी ठरेल अशी मागणी सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना निवेदन देऊन केली आहे.





