बांदा : गोवा – महाराष्ट्र सीमेवर बांदा सटमटवाडी येथील आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका लवकरच सुरु होणार आहे. सदर नाक्यामध्ये कार्यालयीन स्टाफसह नोकर्यांमध्ये स्थानिकांना संधी मिळावी अशी मागणी बांदा सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच जावेद खतीब यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडे केली. तसे लेखी निवेदनही देण्यात आले. आ. नितेश राणे यांनी तत्काळ संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकार्यांशी मोबाईलवरुन संपर्क करुन तसे आदेशही कंपनीला दिले.
बांदा सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आज आ. नितेश राणे यांची कणकवलीत भेट घेतली. टोलनाक्यासाठी बांद्यातील भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली. टोलनाक्यासाठी बांद्यातील भूमिपुत्रांनी कवडीमोलाने जमिनी दिल्या आहेत. नारळ, सुपारी, काजू, आंबा, कोकम बागायतीसह भातशेती क्षेत्रही संपादित केले आहे. बहुतांश शेतकर्यांना अद्यापपर्यंत मोबदलाही मिळालेला नाही. प्रशासनाने चुकीची माहिती देत, प्रसंगी धाक दाखवित भूमिपुत्रांचा रोष पत्करुन भूसंपादन केल्याचे जावेद खतीब यांनी स्पष्ट केले.
बांदा गावात व परिसरात उच्च शिक्षीत युवक युवती आहेत. त्यांना कार्यालयीन कामात सामावून घ्यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. संबंधित ठेकेदार कंपनीला तसे आदेश देण्याची विनंती करण्यात आली. आ. नितेश राणे यांनी तातडीने संबंधित कंपनीच्या जनरल मॅनेजरशी संपर्क साधला. सीमा तपासणीच्या कामात उच्च शिक्षीत स्थानिक उमेदवारांना संधी देण्याचे आदेश दिले. त्यात हयगय न करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रा. पं. सदस्य रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, शामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, सिद्धेश महाजन, संदिप बांदेकर, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.





