कणकवली (प्रतिनिधी)
फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे ; जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन
ग्राहक दिनानिमित्त कणकवलीत जनजागृतीपर कार्यक्रम
ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांना अधिकार व कर्तव्ये प्राप्त झाली आहेत. ग्राहक आपल्या अधिकारांना महत्त्व देतो, त्याचप्रमाणे कर्तव्यांकडे लक्ष दिले पाहिजे.आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी नेहमीच सजग राहिले पाहिजे. ग्राहक दिन हा एका दिवसाचा इव्हेंटन होता, ग्राहक चळवळ बनली पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा कार्यालय,तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचे उदघाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे योगेश खाडिलकर, ग्राहक पंचायतीचे राज्य सदस्य एस. एन. पाटील, सायबर सेलचे अधिकारी सूरज पाटील, भारतीय मानक ब्युरोचे पुष्पेंद्र मिश्रा, अन्न व आवैषध प्रशासनाचे विजय चौगुले, जिल्हा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सुभाष पुराणिक, प्रा. हरिभाऊ भिसे, ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षा श्रद्धा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ग्राहक संरक्षण कायद्यांर्गत ग्राहकांसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत.या कायद्यांची माहिती ग्राहकांनी अवगत केली पाहिजे.या कायद्यांर्गत ग्राहकांना अधिकार व कर्तव्यदेखील प्राप्त झाली आहेत.त्यामुळे ग्राहकांनी अधिकारांबरोबर कर्तव्यांकडे लक्ष दिले पाहिजे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या पॅकेटवर माहिती छापलेली असते, ती माहिती ग्राहकांनी वाचली पाहिजे, असे त्यांनी सांगुन उपस्थितांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.





