दहावी, बारावी प्रमाणेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आतापासूनच मेहनत घ्य -आ. वैभव नाईक
आ. वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
कणकवली ( प्रतिनिधी)
दहावी बारावी या महत्वाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी या उद्देशाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला. या सत्कारातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि भविष्यात हे विद्यार्थी आणखी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश मिळवून मालवण तालुक्याचे नाव उज्ज्वल करतील. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे.त्यामुळे केवळ दहावी बारावीत अव्वल राहून चालणार नाही तर स्पर्धा परीक्षांमध्ये देखील उज्ज्वल यश मिळविण्यासाठी आतापासून कठोर मेहनत घेतली पाहिजे.या भागाचा आमदार या नात्याने त्यासाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली.
आमदार वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज मालवण येथील आर.जी. चव्हाण हॉल वायरी रोड तानाजी नाका येथे संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर म्हणाले,जसा आई वडिलांना आपल्या मुलाच्या यशाचा आनंद असतो तसाच आ. वैभव यांना आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा आनंद आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थी गुणगौरवाचा चांगला उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या या यशात पालकांचेही मोठे योगदान आहे असे त्यांनी सांगितले.
मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, प्रा. मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व करिअर बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना यश मिळविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पालकांचेही त्यांनी अभिनंदन केले.





