सिंधुदुर्ग : सुशांत खिल्लारे खूनप्रकरणी पोलिसांनी आणखी ५ संशयितांना अटक केली असून विशेष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी त्यांना १३ तारीखपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
नव्याने अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीत आबासो उर्फ अभय बाबासो पाटील ३८ रा. वाळवा, सांगली. प्रवीण विजय बळीवंत २४, रा. वाळवा, सांगली. राहुल कमलाकर माने २३, रा. कराड, सातारा. स्वानंद भारत पाटील ३१, रा. इस्लामपूर, सांगली. राहुल बाळासाहेब पाटील ३१, रा. वाळवा, सांगली यांचा समावेश आहे.
वीटभट्टी व्यवसायासाठी कामगार पुरविणार असल्याचे सांगून सुशांत खिलारे याने भाऊसो माने याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते. मात्र, त्याने कामगार पुरवले नव्हते. तसेच घेतलेले पैसे देण्यास ही तो टाळाटाळ करीत होता. याचा राग येऊन सुशांत याला पंढरपूर येथून पुढे कराड येथे आणून भाउसो माने व तुषार पवार यांनी मारहाण केली होती. यात सुशांत याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह आंबोली येथे दरीत टाकताना भाऊसो याचा तोल गेल्याने सुशांत यांच्या मृतदेहाबरोबर तोही दरीत कोसळला होता. त्यात त्याचाही मृत्यू झाला होता.




