सावंतवाडी : सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची विभागीय बैठक शनिवारी आंबोली येथे पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना कार्यरत असून जिल्हा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना तालुक्यातील उपकेंद्रनिहाय वीज ग्राहकांच्या बैठका घेऊन ग्राहकांच्या समस्या जाणून घेत आहे. येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून जिल्हा अंतर्गत वीज ग्राहकांचे मेळावे आयोजित करण्याचे ठरविले असल्याने त्या अनुषंगाने वीज ग्राहकांमध्ये त्यांचे हक्क काय आहेत याची जाणीव करून देत जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना सदरच्या बैठका आयोजित करीत आहे.
शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता आंबोली चौकुळ गेळे गावातील वीज ग्राहकांची बैठक ग्रामपंचायत आंबोली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांचे स्वागत तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले तर वीज ग्राहक संघटनेची उद्दिष्टे विशद करत आता ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी जागृत झाले पाहिजे असे सांगत जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर यांनी ग्राहकांना उत्तम असे मार्गदर्शन केले. तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर यांनी देखील ग्राहकांचे हक्क याविषयी उत्तम मार्गदर्शन केले.
आंबोली येथे आयोजित बैठकीत तिन्ही गावातील ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारा विरोधात अनेक तक्रारी मांडल्या. महावितरणकडे लेखी निवेदने वैयक्तिक ग्राहकांनी त्याचबरोबर ग्रामपंचायत मार्फत देऊन देखील महावितरण त्याची दखल घेत नसल्याची खंत आंबोली सरपंच सौ.पालेकर यांनी व्यक्त केली. मा.सरपंच सुनील नार्वेकर, अशोक नार्वेकर, रत्नाकर फोंडेकर यांनी तर तक्रारींचा पाढाच वाचला. शेती पंपाचे कनेक्शन महावितरणचे कर्मचारी जून महिन्यात खांबावरून कट करतात परंतु वीज बिलापेक्षा जास्त स्थिर आकार वीज वापर नसताना जून ते डिसेंबर असे सहा महिने घेतात. याबद्दल नाराजी व्यक्त करत कमीतकमी विजेचा स्थिर आकार आकारण्यात यावी अशी मागणी सर्वच ग्रामस्थांनी केली. मेनन अँड मेनन कंपनी आंबोली येथे कार्यरत असताना आंबोलीत महावितरणचे सब स्टेशन होते. परंतु कंपनी बंद झाल्यानंतर सदरचे सब स्टेशन बंद करण्यात आल्याने आंबोली येथे विजेच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पूर्वीप्रमाणेच आंबोली येथे वीज उपकेंद्र सुरू करावी करावे अशी प्रमुख मागणी आंबोली सरपंच, चौकुळ सरपंच व सर्व ग्रामस्थांनी केली आहे. घाटमाथ्याच्या वर असलेले आंबोली, चौकुळ, गेळे ही गावे तालुक्यापासून अलिप्त असल्यासारखीच असल्याने त्या ठिकाणच्या सुविधांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. अति प्रमाणात होणारा पाऊस आणि पावसाळ्यातच आंबोली येथे पर्यटन हंगाम असल्याने पावसाळी हवामानात अनेकदा वादळ व अति पावसामुळे विजेचा खेळखंडोबा सुरूच असतो. मी महिन्यात झाडे न तोडल्याने पावसाळ्यात फांद्या पडून , घर्षणाने वीज वाहिन्या तुटतात त्यामुळे दोन दोन दिवस वीज गायब असल्याने पर्यटन हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होतो, आणि व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होते. आंबोली येथे असलेल्या ऊस शेतीतून वीज वाहिन्या गेलेल्या असून बरेचसे विजेचे खांब हे कलंडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वीज वाहिन्या अगदी हाताच्या अंतरावर लोंबकळत आहेत. त्यांचा स्पर्श उसाच्या शेतीला होतो आणि कित्येकदा शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचे प्रकार होतात. त्यामुळे ऊस शेतीचे देखील नुकसान होते. चौकूळ येथील काही खांब जमिनीलगत सडल्याने कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. त्याचबरोबर जुना ट्रान्सफॉर्मर काढून त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर लावताना जुन्या ट्रान्सफॉर्मरचे खराब झालेले खांब देखील तसेच ठेवल्याने ते पडून हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. खडपडे गावातील एक ट्रान्सफॉर्मर जवळपास आठ दहा वर्षांपूर्वी महावितरणने काढून दुरुस्तीसाठी नेला परंतु दुरुस्ती करून आजतागायत सदरचा ट्रान्सफॉर्मर पुन्हा बसविलेला नाही. अशा अनेक तक्रारींचा पाढा आंबोली चौकुळ ग्रामस्थांनी वीज ग्राहक संघटनेकडे वाचला आणि संघटनेच्या माध्यमातून सदरच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी लेखी निवेदने देखील सादर केली. सद्ध्या आंबोली येथे लाईनमन कार्यरत आहेत परंतु परमनंट वायरमन नसल्याने अनेकदा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आंबोलीसाठी परमनंट वायरमन द्यावा अशी मागणी आंबोली सरपंच सौ.पालेकर यांनी केली आहे. आंबोली येथील वीज समस्या निवारण्यासाठी आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांनी महावितरण कडे केलेल्या तक्रारी आणि मागणी पत्र इत्यादींच्या आपल्या दफ्तरी ठेवलेल्या नोंदी पाहून त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा परिचय होतो. आंबोली सरपंच सौ.पालेकर यांची धडपड आणि कार्य पाहून वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
आंबोली येथील बैठकीसाठी वीज ग्राहक संघटनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड, सिं.जि. वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, कार्यकारणी सदस्य समीर शिंदे, अनिकेत म्हाडगुत, सुनील सावंत, आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश शेटवे, माजी.सरपंच सुनील नार्वेकर, ग्रा.पं. सदस्य काशीराम राऊळ, शंकर चव्हाण, अशोक नार्वेकर, रत्नाकर फोंडेकर, बाबुराव गावडे, अंकुश भिसे, सचिन पडवळ, संतोष गावडे, अरुण गावडे बबन गावडे, गुलाबराव गावडे, गणपत पाटील आदी वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवारण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केले जातील असे आश्वासन संघटनेच्यावतीने तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी दिले.
सदरच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वीज ग्राहक संघटनेचे कार्यकारणी सदस्य समीर शिंदे यांनी केले तर वीज ग्राहक संघटनेकडून सदरची बैठक आयोजित करून आंबोली चौकुळ आदी गावांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल अशोक नार्वेकर यांनी संघटनेचे आभार मानले आणि भविष्यात देखील संघटने कडून असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.





