नाशिकच्या भटकलेल्या कुटुंबियांना ‘सामाजिक बांधिलकी’मुळे मिळाली दिशा.!; पोलीस कर्मचार्‍यांचाही मिळाला योग्य ‘प्रसाद’ सोबत विधायक पत्रकार ‘रेडकरांची’ मौलिक साथ.!

86

सावंतवाडी : मुलांच्या नोकरीच्या निमित्ताने 13 नोव्हेंबर रोजी नाशिक येथील पंचवटी जुना आडगाव नाका या शहरातून दोन्ही मुलांना सोबत घेऊन नंदा साळी (वय 56) ही महिला मुलांच्या नोकरीच्या शोधात गोवा व कर्नाटक ही दोन्ही राज्य पालती घातली. मुलगा विजय साळी (वय 32) व मुलगी दिपाली साळी (वय 34) गेला एक महिना कर्नाटक व गोवा राज्यात हे कुटुंब नोकरीसाठी भटकंती करत होते.

सदर बेरोजगार कुटुंबियांना नोकरी तर मिळाली नाही. पण खर्चाला आणलेले पैसेही संपले. कित्येक रात्री त्यांनी उपाशी पोटी रस्त्यावर झोपून काढले. पोटाला अन्न नाही हातात पैसेही उरले नाहीत, कोणी मदत करायला तयार नाही. अखेर शेवटी महिन्यानंतर गोव्यावरून अनवाणी पायी ते सावंतवाडीच्या दिशेने चालत राहिले. पायात चप्पल नसल्याने त्यांच्या तळपायांची चामडी सोलून गेली होती व तिघांचेही पाय प्रचंड सूजलेले होते. तर अंगावरचे कपडे पूर्णपणे जीर्ण व दुर्गंधीयुक्त झाले होते. सर्व परिस्थितीला कंटाळून त्यांची मानसिक स्थितीपण ढासळली होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काल रात्री नऊ वाजता सावंतवाडी मळगाव गाठले. ते तीघेही भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांची अशी दयनीय अवस्था पाहून तेथील मळगावचे ग्रामस्थ, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ज्येष्ठ पत्रकार सचिन रेडकर व श्री. जोशी यांनी त्यांना पोटभर जेवण दिले. परंतु पुढे काय करावं?, कुठे जावं- कसं जावं?,  हा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता. त्यावेळी सचिन रेडकर यांनी ‘सामाजिक बांधिलकी’ प्रतिष्ठानशी संपर्क साधला असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी त्यांना सावंतवाडी येथे पाठवा,, आम्ही त्यांना योग्य असे सहकार्य करू, असं सांगताच सचिन रेडकर यांनी त्या तिघांना लगेचच रिक्षेत बसून सावंतवाडीमध्ये पाठवले असता सामाजिक बांधिलकीचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव व समीरा खलील यांनी त्यांची भेट घेतली.

त्यानंतर संजय पेडणेकर यांनी तात्काळ सावंतवाडीचे पोलीस कर्मचारी प्रसाद कदम यांच्याशी संपर्क साधतात, असता पोलीस प्रसाद कदम लगेच पोहोचले. त्यांनी त्या तिघांची सर्व माहिती घेतली असता सदर मुलांची आई अंगणवाडीची शिक्षिका होती तर मुलगी बी.कॉम., एम. ए. मास्क कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, एम.बीए. इन पब्लिक रिलेशन डिस्टन्स लर्निंग तसेच ती ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये काम करायची तर भाऊ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियर झालेला आहे. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा मनासारखी नोकरी नसल्यामुळे कोणाच्यातरी सल्ल्यावरून त्यांनी नाशिक शहर सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि तोच निर्णय त्यांना आज रस्त्यावर घेऊन आला. या सर्व माहितीचा आढावा घेऊन सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्या तिघांनाही त्यांच्या मूळ घरी नाशिक येथे परत पाठविण्याचा निर्णय घेतला असता त्या अनुषंगाने पोलीस प्रसाद कदम यांनी हेच योग्य आहे, असे सांगून त्यांना नाशिकपर्यंत जाण्याकरिता ट्रेनच्या तिकिटांचे पैसे दिले व सावंतवाडी येथून कणकवली येथे मंगला एक्सप्रेससाठी रेल्वे स्टेशनला जाण्याकरिता स्व खर्चाने रिक्षा सुद्धा उपलब्ध करून दिली.

तसेच सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, रवी जाधव व समीरा खलील यांनी त्यांना प्रवास खर्चासाठी पैसे दिले. तसेच सामाजिक बांधिलकीची सचिव समीरा खलील यांनी त्यांना आपल्या घरी नेऊन त्यांच्या खाण्यापिण्याची तसेच आंघोळीची व कपड्यांची व्यवस्था केली. तसेच त्यांच्या तळ पायांच्या चामड्या गेल्यामुळे त्या तिघांना शुज व चप्पल दिली. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांची रात्री दोन वाजता सुटका झाली. साळी कुटुंबीयांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, संजय पेडणेकर व समीरा खलील तसेच मळगावचे उपसरपंच हनुमान पेडणेकर, पत्रकार सचिन रेडकर व ग्रामस्थ यांचीही मदत लाभली.

त्याचप्रमाणे या सर्व प्रकरणात मोलाची कामगिरी बजावणारे सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रसाद कदम यांचे कौतुक करावे तेवढे कमीच होते, अशा सामाजिक कार्यामध्ये ते नेहमीच पुढे असतात. तर बस स्टॅन्डवरील रिक्षा चालक पम्या वाडकर यांचीही मदत लाभली. या सेवाभावी कार्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सर्वांचे आभार मानले आहेत.