‘ज्या पक्षाचा खासदार किंवा आमदार त्याच पक्षाचा उमेदवार.!’, ‘इंडिया’ आघाडीचे सूत्र निश्चित.! ; खासदार राऊत यांचे वक्तव्य.

43

सावंतवाडी : देशातील ‘इंडिया’ आघाडीचे निवडणुकीबाबतचे सूत्र निश्चित झाले आहे. यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेला ज्या पक्षाचा खासदार किंवा आमदार असेल, त्या पक्षाच्या उमेदवाराला ती जागा देण्यात येईल. तरीही ‘इंडिया’ आघाडीचा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी नेमळे येथे बोलताना केले.

कदाचित लोकसभेच्या निवडणुकीसोबत विधानसभेची ही निवडणूक होऊ शकेल, याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. परंतु तुर्तास ज्या पक्षाचा खासदार किंवा ज्या पक्षाचा आमदार सद्यस्थितीमध्ये आहे, ती जागा त्या पक्षाला मिळणार हे निश्चित आहे. तसा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. ते नेमळे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यापुढे विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी ठाण मांडून बसणार आहेत. मिंदे सरकारच्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, तालुका संघटक भारती कासार, युवासेना तालुका अधिकारी गुणाजी गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.