मुंबई : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचा मोर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. त्यांनी विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “राजकीय आणि पोलिसांच्या आश्रयाशिवाय एवढा मोठा नशेचा व्यापार नाशिकमध्ये चालू शकत नाही. काही मंत्री आणि आमदारांना यातून हफ्ते मिळत होते. हे मला पोलीस सूत्रांनी सांगितले. ललित पाटीलच्या मैत्रिणी विधानसभेपर्यंत आहेत. या ड्रग्ज रॅकेटमध्ये सत्तेतील आमदार, मंत्री सहभागी आहेत. आम्ही हा विषय हाती घेतला तेव्हा सरकारने कारवाई सुरु केली.”
ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे गुजरात आणि इंदूरपर्यंत आहेत. नाशिक येथील मोर्च्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये म्हणून नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आदेश काढले. तुम्ही ड्रग्ज रॅकेटचे सदस्य आहात का?, नशेचा बाजाराला तुमचा पाठिंबा आहे का? तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन आदेश कसे काढू शकता. महाराष्ट्र सरकार देखील नशेच्या बाजारात गुंतले आहे का?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
“देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. ते भरकटल्यासारखे बोलत आहेत. ते भांग पीत नसतील पण त्यांना वासाने नशा येत असेल. त्यांचा आसपास जी माणसे आहेत जी नशेच्या बाजारात फिरतात त्या नशेवाल्यांमुळे देवेंद्र फडणवीसांची मती गुंग झाली. एक पिढी नष्ट होत आहे आणि देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीस गुंड, माफिया यांची बाजू घेत आहेत. गृहमंत्र्यांकडे सर्वांची माहिती असते. विरोधकांची सर्व माहिती असते. त्यांना या कारखान्याची माहिती नव्हती का?. ड्रग्जचं नेक्सस आधीच उघड पडलंय, तुम्ही काय आता बाहेर काढणार?, सोबत असणाऱ्या गुंड माफियांची देवेंद्र फडणवीस बाजू घेत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.





