‘ह्या’ क्रिकेटप्रेमी पीएसआयचे भाग्य उजळलं.! ; ड्रीम इलेव्हनमध्ये जिंकलं तब्बल दीड कोटींचं बक्षीस.

125

पुणे : कोणाचं नशीब कधी उजळेल हे सांगता येत नाही. सध्या  देशात विश्वचषकाचे वारे वाहत आहे. यंदा विश्वचषकावर कोणता देश आपले नाव कोरणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ड्रीम इलेव्हन या प्लॅटफॉर्मवर अनेक क्रिकेट चाहते आपलं नशीब आजमावत असतात. या ड्रीम इलेव्हनमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाचं नशीब उजळलं आहे. या क्रिकेटप्रेमी उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.सोमनाथ झेंडे असं त्यांचं नाव असून ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत  आहे

मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात  केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात –

झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. झेंडे यांना मिळालेल्या या यशामुळे कुटुंबात जल्लोष करण्यात आला. नीट अभ्यास करून खेळल्यामुळेच यश मिळाले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मित्रमंडळीकडून आणि नातेवाईकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे.

सावधान राहण्याचे आवाहन –

सध्या विश्वचषक सुरु असल्याने ऑनलाईन टीम लावून त्यातून पैसे जिंकण्यासाठी तरुण अनेक ॲप डाऊनलोड करून संघ लावतायत. मात्र काही सायबर भामटे अशा लोकांना गंडा घालत आर्थिक फसवणूक करताना पाहायला मिळत आहे.  क्रिकेट सामन्यात ॲपवरून पैसे लावून, टीम लावणारे अनेक ॲप सध्या उपलब्ध आहेत. अनेक तरुण यावर टीम लावतात. मात्र हीच बाब लक्षात घेत सायबर भामटे अनेकांची फसवणूक करत आहेत. तुम्ही लावलेली टीम जिंकली असून, तुम्हाला लाखो रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची थाप मारली जाते. विशेष म्हणजे, फोनवरून संभाषण करून विश्वास देखील संपादन केला जातो. विशेष म्हणजे, या सायबर भामट्याच्या जाळ्यात तरुण सतत फसतात. त्यामुळे तरुणांनी अशा फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.