अहमदाबाद : क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महाकुंभाला अवघ्या काही तासांत सुरुवात होणार आहे. विश्वचषकाआधी माजी खेळाडूसह क्रिकेट तज्ज्ञ भविष्यवाणी करत आहेत. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यानेही विश्वचषकाबाबतची भविष्यवाणी केली आहे. कोणते संघ सेमीफायनलमध्ये, फायनलमध्ये जातील, कोणत्या संघाचे साखळीत आव्हान संपेल याबाबत भाकीत केलेय. अँडरसनच्या या वक्तव्याची क्रीडा विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव होईल. पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपेल, असे जेम्स अँडरसन याने भाकीत केलेय.
बीबीसी स्पोर्ट्ससोबत बोलताना जेम्स अँडरसन याने फायनलमध्ये भारताचा पराभव होईल, असे भाकीत केलेय. अँडरसन म्हणाला की, ‘इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि भारत हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहचतील. पाकिस्तानचा संघ सेमीफायनलच्या जवळ पोहचेल, पण त्यांना प्रवेश मिळणार नाही. न्यूझीलंडचेही आव्हान साखळीतच संपेल. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये फायनलचा थरार होईल. भारताचा पराभव करत इंग्लंडचा संघ विश्वचषक उंचावेल, असे मला वाटतेय.’
जेम्स अँडरसन याने यावेळी दक्षिण आफ्रिकाबाबतही भाष्य केले. तो म्हणाला की, ‘दक्षिण आफ्रिकाने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार कामगिरी केली. त्यांच्याकडे मजबूत फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी आहे, दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता आहे.’
जेम्स अँडरसन याच्यासोबतच बीबीसी स्पोर्ट्स सोबत बोलताना इतर क्रिकेट एक्सपर्ट्स यांनीही आपले मत व्यक्त केले. इंग्लंडचा माजी गोलंदाज जॉनाथन एग्नू याने भारत चॅम्पियनल होईल असे सांगितेल, त्याशिवाय न्यूझीलंड सेमीफायनलपर्यंत पोहचेल, असेही सांगितले. महिला वर्ल्ड कप विजेता एलेक्स हार्टले यानेही भारत चॅम्पियनल होईल असा अंदाज वर्तवलाय. त्याशिवाय इंग्लंड, दक्षिण अफ्रीका आणि पाकिस्तान यांना सेमीफायनलचे दावेदार सांगितले.
कमेंटेटर आतिफ नवाज याने इंग्लंड चषकावर नाव कोरेल असा अंदाज वर्तवलाय. त्याशिवाय भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रीका हे संघ सेमीफायनल खेळतील, असा अंदाज वर्तवला. टायमल मिल्सने पाकिस्तानला विजेता घोषित केले तर वेस्ट इंडीजच्या कार्लोस ब्रेथवेट याने इंग्लंडची निवड केली.
उद्यापासून विश्वचषकाचा शुभारंभ –
उद्या 5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.




