मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपण सर्व महाविजय २०२४ या साठी तयारीला लागलो आहोत. मोदीजींना २०२४ ला पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. हे भाजपसाठी नाही तर देशासाठी महत्वाचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अटलजींची स्वप्न मोदीजी पूर्ण करत आहे. महाविजय २०२४ या मिशनमध्ये पुढील १ वर्ष पूर्णपणे झोकून द्यायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. आपण योग्य मेहनत केली तर आपण सगळे रेकॉर्ड आपण तोडू शकतो. आपली जबाबदारी आहे. आपली काम आपल्याला प्रामाणिकपणाने करायची आहेत. ज्याने पद घेतले आहे तशी काम करायची आहे. पद हे फक्त प्रतिष्ठेसाठी नाही. आपली जबाबदारी समजून काम केली पाहिजे, असे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
महाविजयाचा पहिला टप्पा लोकसभा आहे. २०२४ ची निवडणूक ही भारताच्या इतिहासात नविन अध्याय सुरु करणारी आहे. भारताच्या इतिहासात ही निवडणूक सुवर्ण अक्षराने लिहणारी असेल. कारण मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले तर भारताच्या विकासाची गती परत देशाला मागे नेणारी नसेल. भारत कायम विकास करत राहील. कोणी कितीही ताकदवान आला तर भारताला थांबवणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.





