भारताची सेमीफायनलमध्ये धडक .! ; नेपाळचा २३ धावांनी केला पराभव.

45

हांगझोऊ : चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये आज क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. यामध्ये भारतीय संघाचा सामना नेपाळविरुद्ध झाला. भारतीय संघाने जबरदस्त सांघिक कामगिरी करताना नेपाळवर 23 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचे शतक भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य राहिले.

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर कर्णधार ऋतुराज गायकवाड 23 चेंडूंमध्ये 25 तर तिलक वर्मा 10 चेंडूंवर दोन धावा करून बाद झाले. मात्र, शानदार फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जयस्वाल याने संधी साधली.त्याने 49 चेंडूंमध्ये 8 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. त्याला शिवम दुबे याने 25 धावा करत साथ दिली. रिंकू सिंग याने अखेरीस आपला फिनिशर अंदाज दाखवत 15 चेंडूत 37 धावा चोपल्या. यासह भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये चार बाद 202 धावा उभ्या केल्या.

या धावांचा पाठलाग करताना नेपाळच्या कोणत्याच फलंदाजाला मोठे धावसंख्या करता आली नाही. दिपेंद्र एरी याने पंधरा चेंडूत 32 धावांची सर्वोच्च खेळी केली. इतर फलंदाज 30 धावांच्या पुढे मजल मारू शकले नाहीत. भारतासाठी आवेश खान व रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. यासह भारतीय संघाने 23 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.