नवी दिल्ली : तब्बल ६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करुन नासाचे कॅप्सुल पृथ्वीवर आले आहेत. २४ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता एक कॅप्सुल अमेरिकेच्या उटाहतील ग्रेट सॉल्ट लेक वाळवंटात आलं आहे. उल्कापिंडावरील माती घेऊन हे कॅप्सुल पृथ्वीवर उतरले. हे उल्कापिंड आज पासून १५९ वर्षांनी म्हणजे २१८२ साली पृथ्वीवर पडणार असल्याचं सांगितलं जातं. याला शास्त्रज्ञांनी बेनू असं नाव दिलंय.
उल्कापिंडाची पृथ्वीवर टक्कर झाल्यास मोठा विनाश होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच नासाने OSIRIS-ReX मोहिम आखली होती. उल्कापिंड किती मजबूत आहे हे कळण्यासाठी एका यानाला त्यावरील मातीचे नमुने मिळवण्यासाठी अवकाशात पाठवण्यात आलं होतं. मातीचे नमुने घेऊन कॅप्सुल पृथ्वीवर आलं आहे.
उल्कापिंडाला अवकाशातच मिसाईलने उडवण्याची नासाची योजना आहे. त्यामुळेच हा खटाटोप करण्यात आलाय. कॅप्सुल छोट्या फ्रिजच्या आकाराचे आहे. अशाप्रकारचे ही पहिली मोहिम होती, जिथे एका उल्कापिंडावरील मातीचे नमुने आणण्यासाठी यान पाठवण्यात आलं होतं. ४५ किलोच्य कॅप्सुलमध्ये २५० ग्रॅम मातीचा नमुना आहे.
हायपरसोनिक गतीने हे कॅप्युल पुथ्वीच्या वातावरणात प्रवेश केले. यावर हिटशिल्ड लावण्यात आले होते. त्यामुळे ते सुरक्षित राहिले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना कॅप्सुलची गती आवाजाच्या गतीपेक्षा ३६ पटींनी जास्त होती. नासाच्या टीमने हे कॅप्सुल ताब्यात घेतले आहे. आता त्यावर पुढील संशोधन केले जाईल. विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वी हे यान अवकाशात पाठवण्यात आले होते. दाव्यानुसार, ज्या उल्कापिंडामुळे पृथ्वीवरील डायनासोर नष्ट झाले होते, त्या उल्कापिंडापेक्षा बेनू २० पटीने छोटा आहे. पण, याची पृथ्वीशी टक्कर झाल्यास मोठी हानी होईल. या टक्करने झालेला खड्डा १० किलोमीटर व्यासाचा असेल. त्यामुळे याच्या १००० किलोमीटर अंतरापर्यंत मोठं नुकसान झालेलं असेल. पण, हे उल्कापिंड समुद्रात पडले तर मोठा विनाश ओढवेल.









