नवी दिल्ली- भारतीय अवकाश संशोधन संस्था विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याची संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, अद्याप या दोन्हींशी संपर्क होऊ शकलेला नाही. चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं चंद्रावरील काम पूर्ण केल्यानंतर त्यांना इस्त्रोकडून स्लीप मोडमध्ये पाठवण्यात आलं होतं. चंद्रावर १४ दिवस रात्र आणि १४ दिवस प्रकाश असतो. आपलं काम पूर्ण केल्यानंतर APXS आणि LIBS पेलोड्स तात्पुरते बंद करण्यात आले होते. या पेलोडमधील माहिती लँडरच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवली जाते. सध्या बॅटरी पूर्ण चार्ज आहे. सोलार पॅनला प्रकाश मिळाल्यानंतर लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्यरत होतील. रिसिव्हर ऑन करण्यात आला आहे.
रोव्हर आणि लँडर जागे झाले नाही तर काय?
विक्रम लँडर आणि रोव्हरला स्लीप मोडमध्ये पाठवत असताना इस्त्रोने जाहीर केलं होतं की दोघांनी आपलं काम पूर्ण केलं आहे. त्यांना पुन्हा जागे करण्यात आले तर त्यांना नवी कामगिरी देण्यात येईल.पण, ते जागे झाले नाहीत तर चंद्रावर ‘भारताचे चंद्रावरील राजदूत’ म्हणून तेथेच राहतील, असं इस्त्रोने स्पष्ट केलंय. 22 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण भागात सुर्यप्रकाश येणार होता. पण, अद्याप रोव्हर आणि लँडर जागे झालेले नाहीत.
रोव्हर आणि लँडरला जागे करण्यासाठी इस्त्रोकडून प्रयत्न केले जात आहेत. अद्याप, कोणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरुच राहणार आहे. माजी इस्त्रो वैज्ञानिक तपन मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर १४ दिवसच सक्रीय राहण्यासाठी बनवण्यात आलं होतं.
माजी इस्त्रो प्रमुख एएस किरण कुमार म्हणाले की, चंद्रावरील तापमान -२०० ते -२५० डिग्री सेल्सियस इतके असते. त्यामुळे चांद्रयानचे लँडर आणि रोव्हर जागे होतीलच असे नाही. चांद्रयान-३ ला इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ऑपरेशन सुरु ठेवण्यासाठी बनवण्यात आलेले नाही.









