अजित पवार नाराज की आजारी.? ; सलग तिसऱ्या दिवशी सर्व कार्यक्रम अधांतरी, आज बैठकीला हजर राहणार काय?

48

मुंबई : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळात देखील या घटनेमुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. यादरम्यान जालन्यातील घटनेमुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांनी पुणे, पिंपरी आणि बुलढाण्यातील तीन कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच काल(रविवारी) राज्य सरकारचा बुलढाणा येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान या कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी या चर्चांना विराम दिला.

दरम्यान आजही आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अजित पवारांचे सगळे कार्यक्रम राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या २ दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला नाही. जालन्यातील घटनेनंतर महायुतीतील राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अजित पवारांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती काल कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.